…तर मग गोपीनाथ मुंडेंच्या मृत्यूची CBI चौकशी का केली नाही ? : शिवसेना नेते गुलाबराव पाटील

पोलिसनामा ऑनलाईन टीम – भारतीय जनता पक्षाचे जेष्ठ नेते गोपीनाथ मुंडे यांच्या मृत्यूची सीबीआय चौकशी पक्षाला का करावी वाटली नाही, असा प्रश्न शिवसेना प्रवक्ते आणि पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी विचारला आहे. देवेंद्र फडणवीस यांनी एकनाथ खडसेंच्या रूपात उत्तर महाराष्ट्रातील ओबीसी नेता संपवला, अशी टीकाही त्यांनी केली.

पाटील म्हणाले, गोपीनाथ मुंडेंसारख्या मोठ्या नेत्याच्या मृत्यूची सीबीआय चौकशी करावीशी भाजपला वाटले नाही. दुसरीकडे खडसे आणि फडणवीस यांच्यातील युद्ध असेच चालते. पुन्हा बंद पडते. खडसे यांच्या रूपाने फडणवीस यांनी उत्तर महाराष्ट्राचा एक ओबीसी नेता संपवला आहे. आता खडसेंनी पूर्ण युद्ध लढायला हवे. खडसे बोलतील आणि शांत राहणार असतील तर त्यांच्या बोलण्याला महत्त्व राहणार नाही. युद्ध आणि कुस्ती कधीही अपूर्ण खेळायची नसते, असे मत त्यांनी व्यक्त केले आहे.