‘पाकिस्तानला काबूत ठेवता येत नसेल तर राजीनामा द्या’

औरंगाबाद : पोलीसनामा ऑनलाईन – कंगाल पाकिस्तानपुढे शरणागती का पत्करता ? असा सवाल भारिप बहुजन महासंघाचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी सरकारला विचारला आहे. वंचित बहुजन आघाडीची जाहीर सभा औरंगाबाद येथे शनिवारी पार पडली. यावेळी आंबेडकर यांनी मोदी सरकार तसेच काँग्रेस व राष्ट्रवादी या पक्षांवरही जोरदार हल्ला चढवला. कंगाल झालेले राष्ट्र जर सरकारला काबूत करता येत नसेल तर सरकारने राजीनामा द्यावा अशी मागणीही त्यांनी केली. यावेळी त्यांनी मराठवाड्यातील वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार जाहीर केले.
प्रकाश आंबेडकर म्हणाले की, ‘कंगाल पाकिस्तानशी आरपार लढाई करायची असेल तर त्याला जिगर लागते. फुसके, लुळे, पांगळे लोक ही आरपारची लढाई लढू शकत नाहीत. सीआरपीएफ’च्या जवानांना शहिदांचा दर्जा देणार की नाही, असा प्रश्न उपस्थित करून देश शोकात बुडालेला असताना पंतप्रधान मात्र आपल्या कारभाराच्या फीत कापत सरकारची उपलब्धी काय ते सांगत फिरत आहेत. आम्ही इतरांपेक्षा वेगळे आहोत असा टेंभा मिरविणाऱ्यांनी आपले वेगळेपण काय आहे ते तरी सांगावे.’
उमेदवार जाहीर-
मराठवाड्यातील पाच जागांची उमेदवारी प्रकाश आंबेडकर यांनी जाहीर केली. तसेच परभणी आणि हिंगोली या दोन लोकसभा मतदारसंघांचे उमेदवार येत्या २३ फेब्रुवारीला जाहीर केले जातील असे अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांनी सांगितले.
प्रकाश आंबेडकर म्हणाले की, सत्ताकेंद्रित राजकारणाने सुरुवातीला आपल्या जातीपुरती सत्ता मर्यादित करून ठेवली. त्यानंतर ही सत्ता आपल्या कुटुंबाची कशी राहील हे पाहिले. महाराष्ट्रात नात्यागोत्यातले राजकारण एकवटले असून १६९ कुटुंबे महाराष्ट्रावर राज्य करत आहेत, असा आरोपही आंबेडकर यांनी केला.
असे आहेत वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार
औरंगाबाद-बी.जी.कोळसे पाटील
बीड- प्रा. विष्णू जाधव
नांदेड- प्रा. यशपाल भिंगे
उस्मानाबाद- अर्जुन सलगर
जालना- डॉ. शरदचंद्र वानखेड