पतीच्या मृत्यूनंतर पत्नीनेही घेतला जगाचा निरोप !

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाइन – पतीच्या मृत्यूनंतर अवघ्या तीन दिवसांत पत्नीनेही जगाचा निरोप घेतल्याची घटना नेप्ती (ता. नगर) येथे घडली नव्वदी गाठलेल्या या वृद्ध जोडप्याची एकापाठोपाठ प्राणज्योत मावळली पतीचा विरह सहन न झाल्याचा धक्का बसूनच पत्नीने आपला देह ठेवला. इंद्रायणी/त्रिंबक दगडू पाचारणे असे या वृद्ध दाम्पत्याचे नाव आहे.

नेप्ती, ता. नगर येथील प्रगतशील शेतकरी त्रिंबक दगडू पाचारणे (वय 90) यांचे गुरुवारी (दि.06) निधन झाले. त्यानंतर अवघ्या तीनच दिवसांत म्हणजेच रविवारी (दि.09) त्रिंबक यांच्या पत्नी इंद्रायणी (वय 86) यांनीही देह ठेवला. त्यांच्या पश्‍चात मुलगा महादेव, सात मुली, नातवंडे, पतवंडे असा मोठा परिवार आहे. त्रिंबक यांनी वयाची नव्वदी गाठलेली असतानाही शेतीत त्यांचे मन रमायचे. गावातील सामाजिक व धार्मिक कार्यातही त्यांचा मोठा सहभाग असायचा.

त्रिंबक यांच्या सहचारिणी इंद्रायणी याही धार्मिक वृत्तीच्या होत्या. पाचारणे दाम्पत्याचा नावलौकिक असल्याने ते गाव व परिसरातील सर्वांच्या सुख, दुःखात सहभागी व्हायचे. त्यांनी आपल्या एकुलत्या एका मुलावर आणि सात मुलींवर चांगले संस्कार केले. नव्वदी गाठलेल्या पाचारणे दाम्पत्याने आपली चौथी पिढी पाहिली. तीन दिवसांच्या फरकाने या दोघांनी जगाचा निरोप घेतला असला, तरी पाचारणे दाम्पत्याचा एकाच दिवशी दशक्रियाविधी करण्याचा निर्णय नातेवाईक, गावकर्‍यांनी घेतला आहे. त्याला पाचारणे कुटुंबीयांनीही कोणताही विरोध केला नाही.

नेप्ती येथील अमरधाममध्ये या दोघांवर अंत्यसस्कार करण्यात आले. या दोन्ही अंत्यविधीच्यावेळी जिल्हा परिषदेचे माजी सदस्य अरुण होळकर, बाबासाहेब पवार, सुभाष जपकर, सरपंच सुधाकर कदम, उपसरपंच शिवाजी होळकर, कारभारी चिंते, भारत चिंधे, सोसायटीचे चेअरमन रघुनाथ होळकर, विठ्ठलराव जपकर, देवा होले, पोपट कोल्हे, विठ्ठल चौरे, संजय खामकर, सुभाष चिंधे, दीपक धस, शिवाजी साळवे यांच्यासह कदम, धस, पाचारणे परिवारासह नेप्ती गावातील ग्रामस्थ व समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

आरोग्यविषयक वृत्त –

अळूच्या भाजीने तुमचे वजन राहिल नियंत्रणात

 रूग्ण वेळेत पोहचण्यासाठी रुग्णवाहिकेला आता ‘यल्लो कॉरिडोर’

घटस्फोटीत, विधुर पुरूषांना हृदयरोगाने मृत्युचा अधिक धोका 

ई-फार्मसीसाठी ई-प्रिस्क्रिप्शनची गरज