राम मंदिराच्या वर्गणीसाठी फक्त हिंदू कुटुंबांकडेच जाणार : विहिंप

देहरादून : पोलीसनामा ऑनलाईन –    अयोध्येतील भव्य राम मंदिराच्या उभारणीसाठी विश्व हिंदू परिषदेचे कार्यकर्ते देशातील फक्त हिंदू कुटुंबांकडेच वर्गणी मागण्यासाठी जातील, असे विधान विश्व हिंदू परिषदेचे (विहिंप) प्रवक्ते विजय शंकर तिवारी यांनी केले आहे. विहिंपचे कार्यकर्ते सर्व ठिकाणी जातील पण इतर धर्मियांच्या घरी ते जाणार नाहीत. मात्र, मुस्लिम, शीख, ख्रिश्चन आणि इतर बांधवांनी जर स्वत:हून आमच्याशी संपर्क साधून निधी देण्याची इच्छा व्यक्त केली. तर त्यांच्या निधीचा आम्ही सन्मानाने स्वीकार करू असेही तिवारी म्हणाले.

विश्व हिंदू परिषदेच्यावतीने दि. 15 जानेवारी ते 27 फेब्रुवारी दरम्यान देशभरात श्री राम जन्मभूमी मंदीर निधी समर्पण अभियान सुरू येणार आहे. उत्तराखंडमधील 24 लाख कुटुंबांतील जवळपास 1 कोटी श्री राम भक्तांना राम मंदिराच्या निर्माणासाठी निधी आणि त्यांचा वेळ देण्याचे आवाहन ‘विहिंप’कडून करण्यात येणार आहे. देशभरात 27 फेब्रुवारीपर्यंत ही मोहीम राबवली जात असली तरी उत्तराखंडमध्ये राज्याचा आकार लक्षात घेता 5 फेब्रुवारीपर्यंतच मोहीम राबविण्यात येणार आहे.

राम मंदिराच्या निर्माणासाठी सर्वसामान्य जनतेचे योगदान लाभावे यासाठी देशातील नागरिकांकडून निधी जमा करण्यात येत असल्याचे विहिपने जाहीर केले होते. त्यानंतर या मोहीमेत सर्वधर्मियांकडून निधी घेतला जाणार आहे का? या प्रश्नावर विहिंपचे प्रवक्ते विजय शंकर तिवारी यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. श्री राम मंदिराबाबतचा इतिहास लक्षात घेता आम्ही फक्त हिंदू कुटुंबियांशीच संपर्क साधणार आहोत, असे तिवारी म्हणाले. इतर धर्मियांबाबत पुन्हा एकदा विचारले असता त्यांनी पुन्हा एकदा आम्ही फक्त राम भक्तांशीच संपर्क साधणार आहोत, असे ते म्हणाले.