मोदींना हरवल्यानंतर त्यांना चौकीदाराचेच काम देऊ

बुलडाणा : पोलीसनामा ऑनलाइन – विकासाचे मॉडेल बघण्यासाठी जनतेने भाजप-सेनेची सत्ता देशात आणि राज्यात आणली. मात्र विकासाचे मॉडेल तर आलेच नाही पण आत्महत्यांचे सत्र वाढले. देशाच्या सत्तेमध्ये शेतकऱ्यांप्रती आस्था नसलेल्या व्यक्तींचा भरना आहे त्यामुळे शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढल्या. येत्या निवडणुकीत नरेंद्र मोदी यांना हरवल्यानंतर त्यांना चौकीदाराचेच काम देऊ असे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी म्हटले आहे.

शेतकऱ्यांना प्रोत्साहन देणाऱ्या योजना काँग्रेसच्या कार्यकाळात आम्ही आमलात आणल्या. शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी दिली. देशात सत्ता आल्यास आम्ही सरसकट कर्जमाफी करू आणि शेतकऱ्यांच्या शेत मालाला दीडपट हमीभाव देऊ असे आश्वासन पवार यांनी दिले. जगाच्या दाबापुढे अभिनंदला पाकिस्तानने सोडले. मात्र, नरेंद्र मोदी त्याचे श्रेय घेण्यात मग्न आहेत. ५६ इंचाच्या मोदींनी कुलभूषणला का सोडवले नाही, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.

न खाऊंगा ना खाने दुंगाचा आव आणणाऱ्यांनी ३५० कोटींचे विमान १ हजार ६५० कोटीला खरेदी केले आहे. अंबानींनी कधी कागदाचे विमान सुद्धा तयार केले नाही त्यां अंबानीना राफेल विमान तयार करण्याची जबाबदारी या शासनाने दिली.