शेतकर्‍यांशी चर्चेचा ऑलिंपिक गेम सुरूय का ?

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – गेल्या दोन महिन्यांपासून दिल्लीच्या सीमेवर शेतकरी आंदोलन करत आहेत. असे असताना केंद्र सरकार या शेतकऱ्यांशी चर्चेची पहिली फेरी, दुसरी फेरी असे विक्रम करत आहे. हा काही ऑलिम्पिक गेम सुरु आहे का? खरेतर पहिल्याच दिवशी हा प्रश्न निकाली लागायला हवा होता. अशा शब्दात शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांनी केंद्र सरकारला फटकारले आहे. शेतकरी त्यांच्या मागण्यांसाठी लढत आहेत. मैलोनमेैल पायपीट करून ते दिल्लीत, मुंबईत पोहचले आहेत. त्यामुळे भाजपाचे लोक आतूनच गुदमरले आहेत. प्रमुख लोकांनाही वाटतेय की हा प्रश्न सुटावा, असे राऊत म्हणाले.

खासदार राऊत म्हणाले की, पहिल्या फेरीत शेतकर्‍यांना न्याय मिळायला हवा होता. मला असे वाटतेय की यामागे एक अदृष्य शक्ती आहे. जिला देशातील वातावरण बिघडवायचे आहे. तसेच आपली राजकीय पोळी भाजून घ्यायची आहे, असा संशय राऊत यांनी व्यक्त केला आहे. भाजपाने तेव्हाच निर्णय घेतला असता तर त्याचा त्यांनाच फायदा झाला असता. परंतू प्रजासत्ताक दिनापर्यंत शेतकऱ्यांना आंदोलन करावे लागणे हे दुर्दैव आहे.

कृषी कायदेविरोधातील शेतकर्‍यांचे आंदोलन हे जागतिक स्तरावरील शेतकऱ्यांच्या आंदोलनांपैकी अभूतपूर्व आंदोलन होत आहे. गेल्या 60 दिवसांपासून पंजाब, हरियाणा येथील शेतकरी आंदोलन करत आहेत. राज्या राज्यांतूनही त्यांना पाठिंबा मिळत आहे. मुंबईतही शेतकरी जमा होत आहेत. मात्र, एक काळजी घ्यावी लागेल, कोरोना वाढण्याची शक्यता आहे. याची भीती मुख्यमंत्र्यांनाही वाटत असल्याचे खासदार राऊत म्हणाले. दरम्यान जय श्रीरामवरून कोणाला आक्षेप असण्याचे कारण नाही. हा आस्थेचा विषय आहे. ममतांदेखील श्रीरामवर आस्था ठेवतात, असे मत त्यांनी व्यक्त केले आहे.