पश्चिम महाराष्ट्रात राजकीय भूकंप होणार ? भाजपच्या खासदार अन् आमदारांची वाढतेय राष्ट्रवादीसोबत जवळीक !

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन –  सत्तेपोटी भाजपमध्ये दाखल झालेले अनेक नेते राज्यात झालेल्या सत्ताबदलामुळं आता पुन्हा एकदा मूळ पक्षासोबत सलगी वाढवताना दिसत आहेत. सांगलीचे खासदार संजय काका पाटील आणि साताऱ्याचे शिवेंद्रराजे भोसले ही यातील आघाडीची नावं आहेत. परंतु हे नेते भाजपमध्येच राहणार असल्याचा दावा भाजपकडून केला जात आहे. सदर नेत्यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांसोबत वाढलेल्या भेटीगाठींमुळं पश्चिम महाराष्ट्राच्या राजकारणात वेगळ्याच चर्चांना सुरुवात झाली आहे.

भाजपचे सांगलीचे खासदार संजय काका पाटील हे भाजपच्या कार्यक्रमांमध्ये जेवढे दिसत नाहीत त्यापेक्षाही जास्त ते राष्ट्रवादीच्या व्यासपीठावर दिसत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या मांडीला मांडी लावून बसणारे संजय काका आता सांगलीच्या राजकारणात चर्चेचा विषय ठरताना दिसत आहेत. 2014 साली राष्ट्रवादीच्या आमदारकीचा राजीनामा देत भाजपमध्ये दाखल झालेले संजय पाटील पुन्हा राष्ट्रवादीत येणार अशी चर्चा सुरू झाली आहे. दरम्यान संजय काका यांनी मात्र याबद्दल मौन बाळगलं आहे. त्यामुळं त्यांच्या मौनाचेही बरेच अर्थ काढले जाताना दिसत आहेत.

सांगलीच्या शेजारी असणाऱ्या साताऱ्यातही शिवेंद्रराजे भोसले यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांशी होणाऱ्या भेटीगाठी वाढल्याचं दिसत आहे. काही दिवसांपूर्वी तर ते अजित पवारांना भेटण्यासाठी बारामतीत आले होते. इतकंच नाही तर शरद पवार जेव्हा कधी सातारा दौऱ्यावर असतात तेव्हा शिवेंद्रराजे त्यांच्या स्वागताला प्रत्येक वेळी हजर असतात. काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादीच्या शशिकांत शिंदेंसोबत संघर्षाची भाषा करणाऱ्या शिवेंद्रराजेंची भाषा अलीकडे मैत्रीपूर्ण झाल्याचं पहायला मिळत आहे.

या नेत्यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांसोबतच्या भेटीगाठी या त्यांच्या जुन्या संबंधांमुळं होत आहेत असं स्पष्टीकरण भाजपनं दिलं आहे. काँग्रेसमधील गोंधळाला कंटाळून आणि शरद पवारांच्या वयाकडे पाहून हे नेते भाजपमध्ये आलेले असल्यानं ते पक्षासोबत कायम राहतील असा दावा भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केला आहे.

जे नेते ऐन निवडणुकीच्या तोंडावर भाजपमध्ये गेले होते अशांची संख्या मोठी आहे. विकास कामांसाठी आपण सत्ताधारी पक्षातील नेत्यांना भेट असल्याचा दावा या नेत्यांनी केला आहे. परंतु असाच दावा त्यांनी मूळ पक्ष सोडून भाजपमध्ये प्रवेश करतानाही केला होता. सत्तेशिवाय राजकारण करायची सवय नसलेल्या या नेत्यांची अस्वस्थता लपून राहिलेली नाही. त्यामुळं सध्या या नेत्यांच्या सत्ताधारी पक्षाच्या नेत्यांसोबत होणाऱ्या भेटीगाठी या चर्चेचा विषय ठरताना दिसत आहेत. राजकीय वर्तुळात सध्या अनेक चर्चांना उधाण आल्याचं दिसत आहे.