मराठवाड्यात विजांच्या गडगडाटासह वादळी पाऊस, ८ जणांचा मृत्यू तर राज्यात १५ जणांचे बळी

औरंगाबादः पोलीसनामा आॅनलाईन

राज्यात काल (गुरूवारी) विजांच्या गडगडाटासह झालेल्या वादळी पावसात विविध भागात विजा कोसळून झालेल्या घटनेत 15 जणांचा मृत्यू झाला. यापैकी मराठवाड्यात आठ जणांचा बळी गेला. अचानक वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसात शेतात काम करत असताना अनेक लोकांचा अंगावर विज पडून मृत्यू झाला आहे.

नांदेड जिल्ह्यातील मलकापूर (ता.किनवट) हेमंत (१०) व शालिनी लवसिंग जाधव (८) या बहीण भावाचा वीज कोसळून अंत झाला. कंधार तालुक्यात चुडाजीची वाडी येथे गोठ्यात जनावरे बांधत असलेला विक्रम उद्धव मुंडकर (२७) व देगलूर तालुक्यात केदारकुंठा येथील शेतकरी मारोती केशवराव बाराळे (५०) हे झाडाखाली थांबले असताना वीज कोसळून त्यांचा जागीच मृत्यू झाला. तर लातूर जिल्ह्यातील जळकोट तालुक्यातील मरसांगवी गावात वसीम भांडे (17) याचा विजपडून मृत्यू झाला.आैसा तालुक्यातील कन्हेरीत शेतकरी सुभाष लिंबाजी चव्हाण(60) हे विजेच्या तडाख्यात ठार झाले.

उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये देखील वाणेवाडी शिवारात शेतकाम करत असलेल्या ५ महिलांवर वीज कोसळली. यात शालूबाई पवार (४५), शीतल घुटुकडे (३५) यांचा मृत्यू झाला. तीन महिला जखमी झाल्या.बुलडाण्यातील माटरगाव (ता.शेगाव) येथे वीज कोसळून सय्यद इलीयाज (४५), मुलगी रुक्सानाबी (१५) हे ठार झाले. जळगाव जिल्ह्यातील बाेदवड तालुक्यातील फरकांडे शिवारात रतन देवीसिंग िभल (५५) यांचा वीज पडून मृत्यू. नाशिकमधील चांदवड तालुक्यातील पिंपळगाव धाबळी येथे वीज पडून गंगाराम जाधव (४८) यांचा मृत्यू झाला. सोलापूर जिल्ह्यीतल  करमाळा तालुक्यातील हुलगेवाडी कोर्टी येथे दुपारी ३.३० वाजता वीज कोसळून गंगाराव वाघमारे (२८) या शेतकऱ्याचा मृत्यू झाला. सांगोला तालुक्यात नाझरे गावात बुधवारी रात्री ८ वाजता वीज कोसळून विलास भारत भंडारे (२८) या तरुणाचा जागीच मृत्यू झाला. तर नगर जिल्ह्यीतील कर्जतमधील धालवडीतील अरुण भीमराव चव्हाण (वय-45) यांच्या अंगावर वीज कोसळून मृत्यू झाला.