भारताच्या कूटनीतीचा सर्वात मोठा विजय ; विंग कमांडर अभिनंदन यांची उद्या मुक्तता

वृत्तसंस्था : पाकिस्तानात अडकलेला भारतीय हवाई दलाचे वैमानिक अभिनंदन वर्धमान यांना सुखरूप मायदेशी (भारतात) पाठवणार असल्याची घोषणा पाकिस्तानचे प्रधानमंत्री इम्रान खान यांनी पाकिस्तानच्या संसदेत केली आहे. त्यामुळे उद्या सकाळी अभिनंदन भारतात परतणार असल्याने भारतात जल्लोषाचे वातावरण आहे.


भारताच्या हद्दीत घुसलेल्या पाकिस्तानच्या F-१६ या विमानाला पिटाळून लावताना भारताचे MiG-२१ हे लढाऊ विमान कोसळले होते. विंग कमांडर अभिनंदन वर्धमान हे त्या विमानाचे पायलट होते. त्यावेळी विमान कोसळल्यानंतर ते पाकिस्तानच्या हद्दीत उतरले आणि त्यांना बुधवारी पाकिस्तानने ताब्यात घेतले होते. दरम्यान, पाकिस्तानच्या ताब्यात असलेल्या भारतीय विंग कमांडरची तातडीने आणि सुरक्षित सुटका करण्यात यावी अशी मागणी भारताने केली आहे. पाकिस्तानी लष्कराने ज्या पद्धतीने त्यांचा जखमी असलेला व्हिडीओ प्रसिद्ध केला होता, त्यावरही भारताच्या परराष्ट्रमंत्रालयाने तीव्र आक्षेप घेतला होता.

दरम्यान, यासंदर्भात परिस्थितीतून तोडगा निघावा अशी आमची इच्छा आहे. वातावरण निवळले की आम्ही ताब्यात घेतलेल्या भारतीय वैमानिकाला सोडण्याचा विचार करू असे वक्तव्य पाकिस्तानचे परराष्ट्रमंत्री शाह मेहमूद कुरेशी यांनी पाकिस्तानी प्रसार माध्यमांशी बोलताना केले होते.

दरम्यान, भारताने पाकिस्तान परराष्ट्र मंत्र्याचा प्रस्ताव फेटाळून लावला होता. इतकेच नव्हे तर, कुठल्याही अटी – शर्ती आम्हाला मंजूर नाहीत. आम्हाला फक्त अभिनंदनची सुखरूप सुटका पाहिजे आहे. दरम्यान, भारताच्या रणनीतीला यश आले आहे. उद्या सकाळी अभिनंदनला भारतात पाठवणार असल्याची घोषणा पाकच्या संसदेत प्रधानमंत्री इम्रान खान केली आहे. त्यामुळे सर्वत्र जल्लोष करण्यात येत आहे.