नवी दिल्लीः वृत्तसंस्था – कडाक्याच्या थंडीमध्ये गंगा नदीत मच्छीमारी करणाऱ्या लोकांना एक महिला पाण्यात तरंगताना दिसली. बोटमध्ये असलेल्या मच्छिमारांनी त्या महिलेला आपल्या बोटमध्ये घेऊन बाहेर आणले असता ती महिला जिवंत असल्याचे आढळले. ही धक्कादायक घटना बिहारच्या वैशाली जिल्ह्यातील आहे.
गंगा नदीच्या बर्फासारख्या थंड पाण्यात ही महिला 12 तास पाण्यात तरंगत होती. मच्छीमारांनी जवळपास दहा किमी दूर अंतरावर तरंगत असलेल्या या महिलेला वाचवले. अनिता देवी असे या महिलेचे नाव आहे. राघोपुर डायरा येथील रहिवासी असलेली ही महिला सायंकाळी उशिरा गंगा नदीवरील पिपा पुलावरून जात होती. चक्कर आल्यामुळे पिपा ऑटोमधून खाली उतरली आणि पुलावर बसली. त्या महिलेचा पाय घसरला आणि ती नदीत पडली. ती महिला रात्रभर नदीत तरंगत राहिली.
पहाटेच्या सुमारास राघोपूर पीपा पुलापासून दहा किमी अंतरावर मच्छिमारांच्या एका समुहाने महिला अनिता देवीला पाण्याच्या प्रवाहात वाहताना पाहिले आणि तिला नदीतून बाहेर काढले. मच्छीमारांच्या एका कर्मचाऱ्याने ही संपूर्ण घटना त्याच्या मोबाइलमध्ये कैद केली. रात्रभर नदीच्या थंडीत गेल्यानंतर त्या महिलेची अवस्था अत्यंत नाजूक दिसत होती. त्या महिलेस त्वरित स्थानिक रुग्णालयात आणले गेले जेथे डॉक्टरांनी गरम कपडे आणि हीटरच्या मदतीने त्या महिलेला नवीन जीवन दिले.