कामगार पुतळा झोपडपट्टीतील नागरिकांच्या स्थलांतर व पुनर्वसनाच्या कामाला वेग, मेट्रो स्टेशनसाठी भूसंपादनाला मिळाली गती

पुणे : वृत्त संस्था – मेट्रोच्या कामासाठी जुना तोफखाना, कामगार पुतळा आणि राजीव गांधीनगर झोपडपट्टीची जागा संपादीत करण्यात येणार आहे. येथील पात्र झोपडपट्टीधारकांचे अन्यत्र पुर्नवसन करण्यासाठी झोपडीचे पुरावे सादर करण्यासाठी महापालिकेकडून येत्या काही दिवसांत अखेरची नोटीस दिली जाणार आहे. उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत काल कौन्सिल हॉल येथे झालेल्या मेट्रो प्रकल्पाच्या आढावा बैठकीमध्ये प्रामुख्याने कामगार पुतळा येथील झोपडपट्टी आणि मंडईतील व्यावसायीकांच्या स्थलांतराचा प्रश्‍न चर्चेसाठी आला. यावेळी महामेट्रो व पालिका प्रशासनाने आतापर्यंत केलेल्या कार्यवाहीची माहिती घेतल्यानंतर लवकरात लवकर कार्यवाही करण्याचे आदेश पवार यांनी अधिकार्‍यांना दिले.

त्यानुसार महापालिका प्रशासनाने कामगार पुतळा, राजीव गांधीनगर आणि तोफखाना झोपडपट्टीतील नागरिकांना अखेरची नोटीस बजावण्याची तयारी केली असून येत्या दोन ते तीन दिवसांत या नोटीसेस देण्यात येणार आहेत, अशी माहिती अधिकार्‍यांनी दिली.

या झोपडपट्टीच्या जागेवर मेट्रो स्टेशन होणार असल्याने एसआरएच्या वतीने यापुर्वीच येथील झोपडपट्टीचे सर्वेक्षण करण्यात आले आहे. यामध्ये ३१८ झोपडपट्टीधारकांनीच पात्रतेचे निकष पुर्ण केले आहे. यानंतर २९ जानेवारी २०२० ला येथील झोपडपट्टीवासियांना पुरावे सादर करण्याचे आवाहन करण्यात आले होते. परंतू कोणीही पुरावे सादर केले नाहीत. मात्र, आता कृषि महाविद्यालय ते न्यायालयादरम्यानच्या बोगद्याचे काम पुर्ण झाले असून पुढील टप्प्यात भूमिगत मेट्रो स्टेशन ते स्वारगेट दरम्यानच्या भुयारी मार्गाचे काम हाती घेण्यात येणार आहे. येत्या काही दिवसांत या कामाला गती देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

या पार्श्‍वभूमीवर या तिन्ही झोपडपट्टीतील नागरिकांना पुरावे सादर करण्याचा शेवटचा अल्टिमेटम देण्याची तयारी प्रशासनाने केली आहे. येत्या महिन्याअखेरी पर्यंत हे पुरावे गोळा करण्यात येणार आहेत. सन २००० पुर्वीच्या झोपडपट्टीधारकांचे लोहगाव येथील नवीन प्रकल्पांमध्ये पुनर्वसन करण्यात येणार आहे. मेट्रो प्रकल्प जाहिर होण्याच्या अर्थात २४ डिसेंबर २०१६ पुर्वीच्या झोपडयांचे एसआरएच्या संक्रमण शिबिरामध्ये स्थलांतर करण्यात येणार आहे. पुनर्वसनाची व स्थलांतराची प्रक्रिया ऑनलाईन लॉटरी पद्धतीने केली जाणार आहे.

नागरिकांनी डिसेंबर २०१६ पुर्वीच्या झोपडपट्टीचे पुरावे अर्थात स्वतंत्र झोपडी असल्याबाबतचे कागदपत्र, महापालिकेची सेवाशुल्क पावती, वीजबील, मतदार यादीमध्ये नाव असलेला पुरावा, निवडणूक ओळखपत्र नोटीस मिळाल्यानंतर व प्रसिद्ध झाल्यानंतर १५ दिवसांत द्यावे लागणार आहे. या पुराव्यांची छाननी झाल्यानंतर तातडीने पुनर्वसन, स्थलांतर व भूसंपादनाची कार्यवाही एसआरए मार्फत केली जाणार असल्याची माहिती अधिकार्‍यांनी दिली.