मराठवाड्यातील जलयुक्त योजनेमधील तब्बल 2 हजार 416 कोटींची कामे संशयाच्या भोवर्‍यात

औरंगाबाद : पोलीसनामा ऑनलाइन – माजी मुख्यमंत्री विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या ‘जलयुक्त शिवार’ या महत्वाकांक्षी योजनेतील गैरकारभाराबाबत ‘कॅग’ने ताशेरे ओढल्यानंतर आता या योजनेची चौकशी करण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाने बुधवारी घेतला. मराठवाड्यात या योजनेंतर्गत करण्यात आलेली सुमारे २ हजार ४१६ कोटी रुपयांच्या कामांची चौकशी होण्याची शक्यता असल्याने ही कामे केलेल्या ठेकेदारांच्या पायाखालची वाळूच सरकली आहे.

मराठवाडा विभागात २०१५ ते २०१९ साली ६ हजार २० गावांमधील १ लाख ७४ हजार १६२ कामे संशयाच्या भोवऱ्यात आली आहेत. या कामांमध्ये ठेकेदारांची मर्जी राखली असल्याचे २०१७ मध्ये उघडकीस आले होते. तत्कालीन विरोधी पक्षाने बहुतांश ठेकेदार हे तत्कालीन सरकारच्या मर्जीतले असल्याचा आरोप केला होता. औरंगाबाद जलसंधारण विभाग, विभागीय आयुक्तालयांतर्गत असलेल्या रेकॉर्डनुसार ३१ मार्च २०२० पर्यंत मराठवाडा विभागातील कामांवर ९२.२३ टक्के खर्च करण्यात आला आहे. तर ९४.१८ टक्के कामे झाली आहेत.

जलयुक्त शिवार योजनेंतर्गत किती पाणी साचले ?
चार वर्षांमध्ये ११.१४ टीसीएम पाणीसाठा साचल्याचा दावा रेकॉर्डनुसार दिसतो आहे. २२.२८ लक्ष हेक्टर सिंचन यामाध्यातून झाल्याचा दावाही करण्यात आला आहे. २०१५ ते २०१९ पर्यंत दरवर्षी ३.३ ते १.५८ टक्क्यांदरम्यान टीसीएम पाणीसाठा निर्माण झाला.

वर्ष गावांची संख्या खर्च
२०१५ – १६ १,६८५ ९६३ कोटी
२०१६ – १७ १,५१८ ७९० कोटी
२०१७ – १८ १,२४८ ३५२ कोटी
२०१८ – १९ १,५६९ ३११ कोटी
एकूण – ६,०२० २,४१६ कोटी