Mansukh Hiren Case : ‘तू अटक हो,…’, सचिन वाझेंबाबत मनसुख हिरेन यांच्या पत्नीचा जबाब

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी (Mukesh Ambani) यांच्या दक्षिण मुंबईतील अँटिलिया निवासस्थानासमोर सापडलेल्या संशयित स्कॉर्पिओ कारचे मालक मनसुख हिरेन (Mansukh Hiren) हे मुंब्रा येथील रेतीबंदर या ठिकाणी शुक्रवारी (दि. 5 मार्च) मृतावस्थेत सापडला. या घटनेनंतर एकच खळबळ उडाली होती. याप्रकरणी आता एटीएसनं हत्येचा गु्न्हा दाखल केला आहे. दरम्यान, अंबानींच्या घराबाहेर सापडलेल्या स्कॉर्पिओ कारप्रकरणी मनसुख यांची मुंबई क्राईम ब्रँच आणि एटीएसकडून चौकशी सुरू होती. परंतु याच दरम्यान मनसुख यांचा मृतदेह सापडल्यानं गृहमंत्र्यांनी याबाबतचा तपास मुंबई पोलिसांकडे न देता एटीएसकडे दिला. या प्रकरणी हिरेन यांच्या पत्नी विमला यांनी दिलेल्या फिर्यादीवरून एटीएसनं 7 मार्च रोजी हत्येचा गुन्हा दाखल केला आहे. विमला यांनी एटीएसला दिलेल्या जबाबात अनेक धक्कादायक खुलासे केले आहेत.

विमला यांनी सीआययूचे सहायक पोलीस निरीक्षक सचिन वाझे यांनी आपल्या पतीला मुकेश अंबानी प्रकरणात अटक हो, दोन-तीन दिवसांत मी तुला जामिनावर बाहेर काढतो असं सांगितलं होतं, असा उल्लेख जबाबात केला आहे.

एटीएसनं तपासातील सर्व कागदपत्रं मुंब्रा पोलीस ठाण्याकडून हस्तगत करून पुढील तपास सुरू केला आहे. त्यानुसार 7 मार्च रोजी भादंवि कलम 302, 201, 34, 120- बी प्रमाणे हिरेन यांच्या पत्नी विमला मनसुख हिरेन यांच्या फिर्यादीवरून एटीएसनं गु्न्हा दाखल केला आहे. हिरेन यांच्या चेहऱ्यावर जखमा आढळून आल्या असून, त्यांचा मृतदेह 10-12 तास पाण्यात होता, अशी शक्यता शवविच्छेदन अहवालातून स्पष्ट होत आहे.

विमला यांनी एटीएसला दिलेल्या जबाबात म्हटलंय की, 3 मार्च रोजी माझे पती हिरेन नेहमीप्रमाणे दुकानावर गेले. रात्री दुकान बंद करून 9 वाजता घरी परत आले. त्यावेळी रात्री मला माझ्या पतीनं सांगितलं की, सचिन वाझे बोलत आहेत की, तू या केसमध्ये अटक हो, दोन तीन दिवसांत मी तुला जामिनावर बाहेर काढतो. मी तेव्हा हिरेन यांना सांगितलं की, तुम्ही अटक होण्याची काही गरज नाही. आपण कोणाकडे तरी सल्लामसलत करून निर्णय घेऊ त्यावेळी हिरेन थोडे टेन्शनमध्ये असल्याचं वाटत होतं.

पुढं या जबाबात म्हटलं आहे की, 4 मार्च रोजी माझे पती हिरेन यांनी सकाळी माझ्या मोबाईलवरून माझे दीर विनोद यांची पत्नी सुनीता यांच्या फोनवर फोन करून कदाचित मला अटक होईल तरी तू माझ्यासाठी चांगल्या वकिलांशी माझा अटकपूर्व जामीन मिळण्यासाठी बोलणी करून ठेव असं सांगून ते दुकानात निघून गेले होते, असंही त्यांनी म्हटलं होतं. यावरून आता मनसुख यांना अटक होण्यासाठी वाझे दबाव टाकत नव्हते ना, अटक होणार या विचारानं मनसुख तणावाखाली होते का, असे अनेक सवाल उपस्थित होत आहेत.