केवळ संशयावरून तरूणाच्या भावाचा केला खून

औरंगाबाद : पोलीसनामा ऑनलाइन – वैजापूर येथे प्रेमसंबधातून तरुणीचे अपहरण केल्याच्या संशयातुन तरुणाच्या अल्पवयीन भावाचा तीक्ष्ण हत्याराने खून करून त्याच्या आई वडिलांना देखील मारहाण करण्याची घटना शनिवारी (दि.१४) रात्री तालुक्यातील लाख कांडला येथे घडली असून, भीमराज बाळासाहेब गायकवाड (वय १७), असे मृत व्यक्तीचे नाव असून अलकाबाई बाळासाहेब गायकवाड (वय ४१) वडील बाळासाहेब गायकवाड (वय ४१) हे दोघे गंभीर स्वरूपात जखमी आहे.

या प्रकरणातील २० वर्षीय तरुणी बेपत्ता असल्याची तक्रार पोलिसांत शुक्रवारी दाखल झाली आहे. भीमराजचा मोठा भाऊ अमोल देखील शुक्रवार पासून गावात नसल्याने अमोल यानेच प्रेमसंबंधातून तिचे अपहरण केल्याचा संशय देवकर कुटुंबीयांनी केला होता. मुलीचे घर खंडाळा येथे असून अमोलचे घर खंडाळा येथून ६ कि.मी अंतरावर असणाऱ्या लाख खंडाळा येथे आहे.

तरुणीचे अपहरण झाल्याच्या संशयातून देविदास व संशयातून देविदास रोहिदास हे दोघे तलवारीसारखे तीक्ष्ण हत्यार घेऊन शनिवारी रात्री वस्तीवर धडकल्यानंतर बाहेर झोपलेल्या भीमराजवर हल्ला करून दोघांनी त्याला ठार केले व नंतर त्याच्या आई वडिलांनाही जखमी केले. या प्रकरणी देविदास देवकर व रोहिदास देवकर या दोघा विरोधात खून व ॲट्रोसिटी अंतर्गत गुन्हा दाखल असून दोघांनाही अटक करण्यात आली आहे.

दरम्यान अंत्यविधी आरोपींच्या घर जवळच करा अशी मागणी गायकवाड कुटुंबीयांनी केली होती,मात्र पोलिसांनी समजूत काढल्यानंतर गायकवाड यांच्या वस्तीजवळ भीमराज याच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले.