भावाच्या कानशिलात लगावल्याचा आला राग; तरुणाची चाकूने सपासप वार करून हत्या

अमरावती : एका तरुणाने क्षुल्लक कारणावरून अल्पवयीन मुलाला कानशिलात लगावली होती. या रागातून त्या तरुणाची दोघांनी चाकूने सपासप वार करत निर्घृण हत्या केली. ही घटना राजापेठ ठाणे हद्दीतील जेवड नगरात गुरुवारी रात्री साडेनऊच्या सुमारास घडली.

अमन किशोर खंडारे असे हत्या झालेल्या तरुणाचे नाव आहे. अमन याच्या हत्येप्रकरणी आरोपी डिक्याव ऊर्फ अभिषेक ऊर्फ मामू राकेश ऊर्फ रमेश डिक्याव (21, रा. पोस्टमन कॉलनी, जेवड नगर) व एका अल्पवयीन मुलाविरुद्ध राजापेठ पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यांच्यावर भादंवि कलम 302, 34 अन्वये गुन्हा नोंदवण्यात आला आहे. या हत्येची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी डिक्यावला जेवड नगरातून अर्धा तासात अटक केली. तर अल्पवयीनाला ताब्यात घेतले आहे.

अमन खंडारे याचा डिक्यावच्या अल्पवयीन भावासोबत क्षुल्लक कारणावरून वाद झाला होता. त्यानंतर अमनने त्या अल्पवयीन मुलाच्या कानशिलात लगावली. त्याने ही बाब मोठा भाऊ डिक्यावला सांगितली. त्या अल्पवयीन मुलाजवळ आधीच चाकू होता. त्यानंतर तो हा चाकू घेऊन घटनास्थळावर आला. त्याने अमनवर चाकूने हल्ला चढविला. अमन आपला जीव वाचविण्यासाठी रस्त्याने पळत होता. तर डिक्याव त्याच्या पाठीवर चाकूने घाव घालत होता. त्यानंतर डिक्यावने तेथून पळ काढला. या हल्ल्यानंतर अमन रक्ताने माखला होता. त्यानंतर नागरिकांच्या मदतीने जिल्हा सामान्य रुग्णालयात आणण्यात आले. मात्र, उपचारापूर्वीच डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.