ज्या पक्षाचे उमेदवार रिंगणात नाहीत, त्यांच्या सभांना महत्त्व नसते ; पुतण्याचा राज काकांना टोला

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – ‘लाव रे तो व्हिडीओ’ वरून मनसे अध्यक्ष राज ठाकरे सध्या चर्चेत आहेत. सोशल मीडियावर तर ‘लाव रे तो व्हिडीओ’ ने धुमाकूळ घातला आहे. बुधावारी राज ठाकरे यांची भांडुप येथे सभा झाली यावेळी त्यांनी भाजप -शिवसेना युतीवर सडकून टीका केली. तर दुसरीकडे युवासेनेचे अध्यक्ष आदित्य ठाकरे यांनी काका राज ठाकरे यांना देखील टोला लगावला आहे. “ज्या पक्षाचे उमेदवार रिंगणात नाहीत, त्यांच्या सभांना महत्त्व नसते” अशी टीका आदित्य ठाकरे यांनी केली आहे.

ईशान्य मुंबई लोकसभा मतदारसंघाचे शिवसेना-भाजपा-रिपाइं महायुतीचे उमेदवार मनोज कोटक यांच्या प्रचारासाठी भांडूप येथे आयोजित रोड शो मध्ये आदित्य सहभागी झाले होते. राज ठाकरे यांनी राष्ट्रवादीला दिलेल्या पाठिंब्यामुळे त्यांच्यावर टीका देखील केल्या जात आहेत. तसेच सध्या ते लोकसभेच्या रिंगणात देखील नाहीत याच गोष्टीवरून युवासेना प्रमुख आदित्य यांनी राज ठाकरेंना टोला लगावला आहे.

ईशान्य मुंबईमधून किरीट सोमय्या यांचा पत्ता कट करून तिकिट मिळालेल्या मनोज कोटक यांच्यासाठी आदित्य यांनी रॅली काढून रोड शो केला. राज्यात भगवे वादळं असून ज्या ठिकाणी बाण आहे तिथं बाणाला आणि ज्या ठिकाणी कमळ आहे, त्या ठिकाणी कमळाला मतदान होत असल्याचा दावा त्यांनी केला. काल औरंगाबादमध्ये झालेल्या महायुतीच्या सभेमध्ये शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनीही राज यांच्यावर टीकास्त्र सोडले होते.