दहशतवादाविरोधात ‘झीरो टॉलरन्स’ निती -: अमित शहा

मुंबई : वृत्तसंस्था – मोदी सरकारने दहशतवादाविरोधात झीरो टॉलरन्सची निती अवलंबली आहे. आम्ही कोणत्याही प्रकारचा दहशतवाद खपवून घेणार नाही. जो ज्या भाषेत बोलेल त्या भाषेत त्याला उत्तर दिलं जाईल, असे भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी एका वृत्तवाहीनीशी बोलतांना सांगितले.

स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदा सर्जिकल स्ट्राईक आणि नंतर एअर स्ट्राईकच्या माध्यमातून देशाची सुरक्षा किती महत्वाची आहे, त्याचं धाडस देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जगाला दाखवून दिले आहे की आमच्या देशाच्या सुरक्षेबाबत तसेच देशाच्या सिमेसंदर्भात कोणीही खेळू शकत नाही. असेही शहा यांनी यावेळी सांगितले.

एअर स्ट्राईक असेल, सर्जिकल स्ट्राईक तसेच अंतराळातील मिशन शक्ती संदर्भात देशाचे पंतप्रधान जनतेला संबोधत आहेत. त्यावरून देशाच्या सुरक्षेबाबत भाजप तसेच मोदी हे राजकारण करत आहेत अशी टिका सर्वच विरोधीपक्ष करत आहेत. त्यासंदर्भात बोलतांना अमित शहा यांनी सांगितले की, भाजपचे सरकार हे देशाच्या सुरक्षेसंदर्भात खूप सजग आहे. सुरक्षेसंदर्भात कोणतीही जोखिम उचलली जाणार नाही. तसेच देशाच्या सुरक्षेचा मुद्दा हा खरं तर निवडणूकीचा महत्वपूर्ण मुद्दा असला पाहिजे. कारण देशाची सुरक्षा कोण करतं आहे, हे देशातील जनतेला समजलं पाहिजे.

एअर स्ट्राईक असेल अथवा सर्जिकल स्ट्राईक, हे आमचे निवडणूकीचे मुद्दे आहेत. तसेच हा आपल्या देशाच्या सुरक्षेचा मामला आहे. त्यामुळे त्याची माहिती ही देशाच्या जनतेला झालीच पाहीजे असेही अमित शहा यावेळी म्हणाले.