दुर्दैवी ! वीज पंप पाण्यात सोडताना दोघांचा बुडून मृत्यू, पुणे जिल्ह्यातील घटना

ओतूर : पोलीसनामा ऑनलाइन –  येडगाव धरणाच्या बॅक वॉटरमध्ये वीज पंप पाण्यात सोडताना दोन तरुणांचा बुडून मृत्यू झाला. धोलवड (ता.जुन्नर जि.पुणे) येथील जांभूळपट शिवारात मंगळवारी (दि.25) दुपारी ही दुर्दैवी घटना घडली आहे. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

ओतूर पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरिक्षक परशुराम कांबळे यांनी दिलेल्या माहितीनुसार, कौस्तुभ शरद गंभीर (वय-30 रा. खामुंडी,ता.जुन्नर) आणि आंतिराम गंधास भालेरा (वय-25,सध्या रा.खामुंडी,ता.जुन्नर,मुळ रा.मध्यप्रदेश) अशी मृतांची नावे आहेत. मंगळवारी दुपारच्यावेळी कौस्तुभ आणि आंतिराम हे दोघे येडगाव धरणाच्या पाण्यात वीज पंप सोडत होते. त्यावेळी अचानक पाण्यात बुडून दोघांचा मृत्यू झाला. या प्रकरणी किरण अरुण शिंगोटे यांनी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.