एसबीआयच्या २५ कोटी ग्राहकांना होणार फायदा

नवी दिल्ली : वृत्तसंस्था

स्टेट बॅंक ऑफ इंडियाने (SBI) करोडो ग्राहकांना दिलासा दिला आहे. बॅंक खात्यात कमीत कमी शिल्लक न ठेवण्यावर लागणा-या अतिरिक्त शुल्कामध्ये कपात करण्यात आली आहे.

बॅंकेकडून या शुल्कामध्ये ७५ टक्के कपात करण्यात आली आहे. नवीन दर एक एप्रिल २०१८ पासून लागू होतील. या नव्या नियमानुसार कोणत्याही खातेदाराला १५ रूपयांपेक्षा जास्त दंड द्यावा लागणार नाही. ही रक्कम आत्तापर्यंत ५० रूपये इतकी होती.
महानगर आणि शहरी भागात कमीत कमी न ठेवल्यास चार्ज ५० रूपयांवरून १५ रूपये केला आहे. लहान शहरांमध्ये हे शुल्क ४० रुपयांहून १२ रूपये करण्यात आला आहे. त्याचप्रमाणे ग्रामीण भागांमध्ये कमीत कमी शिल्लक न ठेवण्यावरचा चार्ज ४० रूपये नाही तर १० रूपये लागणार आहे. या शुल्कावर जीएसटी वेगळा लागेल.

बॅंक रिटेल आणि डिजिटल बॅंकिंगचे एमडी पी.के गुप्ता म्हणाले की,”आमच्या ग्राहकांच्या भावना आणि त्यांच्या प्रतिक्रिया जाणून घेतल्यानंतरच हा निर्णय घेण्यात आला आहे. एसबीआय बॅंकेच्या या निर्णयामुळे २५ कोटी खातेदारांना फायदा होणार आहे. सध्या एसबीआयमध्ये जवळपास ४१ कोटी बचत खाती आहेत. त्यातील १ कोटी खाती पंतप्रधान जनधन योजने अंतर्गत आहेत.”