एसबीआयने तब्बल ४१.१६ लाख खाती केली बंद

नवी दिल्ली: स्टेट बॅंक आॅफ इंडियाने तब्बल ४१.१६ लाख खाती बंद केली आहेत. हा खुलासा माहिती अाधिकारामध्ये झाला असून ज्यांनी मिनिमम बॅलन्स ठेवला नाही अशा खातेदारांची खाती बंद करण्याचा निर्णय स्टेट बॅंकेने घेतला आहे. एप्रिल २०१७ ते जानेवारी २०१८ या दहा महिन्यांमध्ये ज्या खातेदारांनी मिनिमम बॅलन्स ठेवला नाही अशा ४१.१६ लाख खातेदारांची खाते बंद करण्यात आली आहेत.

सामाजिक कार्यकर्ते चंद्रशेखर गाैड (मध्यप्रदेश) यांनी माहिती अाधिकारातून एसबीआयकडे याबाबत विचारणा केली होती. चंद्रशेखर यांना २८ फेब्रुवारी रोजी एसबीआयने ही माहिती पाठवली. वित्तमंत्रालयाच्या आकडेवारीनुसार, एप्रिल ते नोव्हेंबर 2017 या काळात खात्यावर किमान शिल्लक न ठेवणाऱ्या खातेदारांना लावलेल्या शुल्कापोटी एसबीआयला तब्बल १७७१.६७ कोटी रुपये मिळाले. मिनिमम बॅलन्स ठेवू न शकल्यामुळे खातेदार खाते वापरत नाही. त्यामुळे एसबीआयने मिनिमम बॅलन्समध्ये ७५ टक्के कपात केली आहे. नवे शुल्क एक एप्रिलपासून लागू होणार आहे. असे बँकेच्या वतीने सांगण्यात आले.

स्टेट बँक ऑफ इंडियात खाते असेल आणि त्यातील रक्कम ‘मिनिमम बॅलन्स’च्या खाली गेली तर आता ५० रुपयांऐवजी फक्त १५ रुपयेच दंड भरावा लागणार आहे. या निर्णयाची अंमलबजावणी एक एप्रिल २०१८ पासून सुरू होईल. त्यामुळे देशभरातील तब्बल २५ कोटी खातेदारांना याचा फायदा होणार आहे. मेट्रो आणि शहरी परीसरातील खातेदारांना मिनिमम बॅलन्स न ठेवल्यास ५० रूपयांवरून १५ रूपये दंड केला आहे. लहान शहरांमध्ये चार्ज ४० रुपयांहून १२ रूपये करण्यात आला आहे. तर ग्रामीण भागांमध्ये मिनिमम बॅलन्स न ठेवण्यावरचा चार्ज ४० रूपये नाही तर १० रूपये करण्यात आला आहे. या चार्जवर जीएसटी वेगळा लागणार आहे.