मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन
राज्यात वन विभागाने लोकसहभागातून महावृक्ष लागवड मोहीम हाती घेतली असून या मोहिमेत शहरातील नागरिकांनीही सहभागी व्हावं आणि आपलं शहर स्वच्छ, सुंदर आणि हरित करावं, असं आवाहन वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केले.
वनमंत्र्यांनी अशा आशयाचे पत्र राज्यातील सर्व नगरपालिका, नगरपरिषदा, महानगरपालिकांना, नगराध्यक्ष, महापौर यांना पाठवले आहे. याच पत्रात त्यांनी शहरवासियांना देखील वृक्ष लागवड मोहिमेत सहभागी होण्याची साद घातली आहे.
भारतीय वन सर्वेक्षण अहवालातून राज्याच्या महावृक्ष लागवडीचे फलित दिसून येत असल्याचे सांगताना त्यांनी विविध क्षेत्रात महाराष्ट्राने देशात मिळवलेल्या प्रथम स्थानाची माहिती दिली आहे. पत्रात ते म्हणतात, महाराष्ट्र राज्य हे वनेत्तर क्षेत्रामधील वृक्ष आच्छादनामध्ये (Tree Cover in Non Forest Area) देशामध्ये अग्रगण्य राज्य ठरले आहे. राज्यामध्ये कांदळवन तसेच बांबू क्षेत्रात भरघोस वाढ झाली आहे. राज्यामध्ये घनदाट जंगल म्हणजे ७० टक्क्यांपेक्षा जास्त घनतेची जंगले यामध्ये ५१ चौ.कि.मी. ची वाढ दर्शविली आहे.
भारतीय वनस्थिती अहवाल २०१५ नुसार राज्याचे कांदळवन क्षेत्र २२२ चौ. कि.मी. होते ते २०१७ मध्ये वाढून ३०४ चौ.कि.मी. इतके झाले आहे. यामध्ये ८२ चौ कि.मी. ची भरघोस वाढ नोंदवण्यात आली आहे. २०१५ मध्ये राज्यात एकूण जलव्याप्त क्षेत्र १११६ चौ कि.मी. होते ते २०१७ मध्ये वाढून १५४८ चौ.कि.मी. इतके झाले आहे. जल व्याप्त क्षेत्रातील ही वाढ ४३२ चौ कि.मी. इतकी आहे.