Chandrakant Patil : ‘वळसे पाटील गुन्हा दाखल करा आम्ही घाबरत नाही, तुम्ही कमिशनसाठी आडून बसला आहात; देशमुख अशाच धमक्या देऊन गेलेत’ 

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – ब्रुक फार्मा कंपनीच्या मालकाची चौकशी प्रकरणात भाजप नेत्यांवर कारवाई करण्याचे संकेत राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी दिले आहेत. वळसे पाटील यांनी इशारा दिल्यानंतर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. दिलीप वळसे पाटील कसल्या केसेस दाखल करता, कुणी घाबरत नाही, तुम्ही कमिशनसाठी आडून बसला आहेत. खुशाल गुन्हा दाखल करा, अनिल देशमुखही धमक्या देत गेले, असा इशारा चंद्रकांत पाटील यांनी दिला आहे.

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांनी पोलिसांवर दबाव आणण्याचा प्रयत्न केला, सरकारी कामात हस्तक्षेप केला, असे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी म्हटले आहे. येत्या दिवसांमध्ये गुन्हा दाखल करण्यासाठी निर्णय घेतला जाऊ शकतो, असे संकेत त्यांनी दिले आहे. दिलीप वळसे पाटील यांच्या इशाऱ्यावर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे. चंद्रकांत पाटील कोविड केअर सेंटरची पाहणी करण्यासाठी आले होते. कोविड केअर सेंटर बाया कर्वेंच्या हॉस्टेलमध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघांनी उभारले आहे.

वळसे पाटील इंजेक्शन दिले की ते पुढे जातात
चंद्रकांत पाटील म्हणाले, केंद्राने रेमडेसिवीर द्यायचं नाही असं पत्र जाहिर केलं. ते पत्र गुजरात एफडीएने दिलेलं आहे. त्याबाबत ही सरकार उघडं पडलं. देवेंद्र फडणवीस आणि प्रवीण दरेकर याबाबत आढावा घेत आहेत. अॅडव्हान्स देत नसल्याने कंपन्या आडून बसल्या आहेत. आम्ही द्यायला निघालो तर त्यावर आरोप झाले. जो तयार त्याला दमबाजी केली. अशा अनेक केसेस दाखल करा, आम्ही घाबरत नाही. वळसे पाटील सौम्य वाटले होते, त्यांनाही इंजेक्शन दिलं की ते पुढे जातात, कमिशनसाठी हे सरकार अडून बसले आहे, असा घणाघाती आरोप त्यांनी ठाकरे सरकारवर केला आहे.

आम्ही राजकारणात माहिर आहोत
चंद्रकांत पाटील पुढे म्हणाले, कोरोनाची परिस्थिती गंभीर होत चालली असताना सरकारला परिस्थिती हाताळता येत नसल्याने केंद्राकडे ढकललं जात आहे. आम्ही पण राजकारणात माहीर आहोत. दररोज खोटं बोलताय, महाराष्ट्रात लशी जास्त आल्या, त्या वाया गेल्यात आणि काळाबाजार केला. माझा जाहीर आरोप आहे, त्याची श्वेतपत्रिका काढा, असं चंद्रकांत पाटील म्हणाले.

मुख्यमंत्री म्हणून तुम्ही काय करता
महाराष्ट्रातील कोरोनाची परिस्थिती गंभीर होत असून परिस्थिती हाताबाहेर गेली आहे. सर्व काही केंद्रावर ढकलण्याचे काम सध्या सुरु आहे. मात्र मोदी फोन उचलत नाही असं खोटं बोलायचं. मोदी फोनवर उद्धव ठाकरे यांना उपलब्ध झाले, त्यांनंतर ऑक्सिजनवर बैठक घेतली. उद्या जर लोक मंत्र्यांच्या, आमदारांच्या घरात घुसले तर नवल वाटू देऊ नका. मुख्यमंत्री म्हणून तुम्ही काय करत आहात, तुम्ही का जनतेशी बोलत नाही, असा प्रश्न पाटील यांनी उपस्थित केला.