Coronavirus : नव्या कोरोना रूग्णांची फुफ्फुस होतायेत लवकर खराब; रूग्णांच्या छातीच्या एक्स-रे ची स्थिती अतिशय वाईट

मुंबई – गेल्या काही दिवसांपासून मुंबईसह राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये कोरोना रूग्णांची संख्या हळुहळु वाढू लागली आहे. एकीकडे कोरोना रूग्णांची संख्या वाढत असताना दुसरीकडे नव्याने आढळून येणाऱ्या कोरोनाग्रस्त रूग्णाच्या छातीचा एक्स-रे रिपोर्टमध्ये कमालीचा बदल झालेला दिसून येत आहे. या एक्स-रे रिपोर्टमध्ये व्यक्तीच्या फुफ्फुसांची अतिशय वाईट अवस्था पाहायला मिळत आहे. रूग्णांची फुफ्फुस पांढरी झाली आहेत, अशा दावा वैद्यकीय तज्ज्ञांद्वारे केला जात आहे.

२०२० मध्ये कोरोना व्हायरस या विषाणूने अक्षरशः धुमाकूळ घातला होता. जगभरात या विषाणूंने अनेकांना प्रभावित केले होते. या विषाणूच्या भितीपायी देशभरात लॉकडाऊन जारी करण्यात आला होता. परंतु, कालांतराने रूग्णांची संख्या कमी होऊ लागल्याने नागरिकांनी सुटकेचा निःश्वास सोडला होता. परंतु, फेब्रुवारी महिन्यापासून पुन्हा राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये कोरोनाने डोके वर काढले आहे. त्यामुळे सर्वसामान्यांच्या चिंतेच पुन्हा एकदा भर पडली आहेत. त्यातच आता उपचारासाठी येणाऱे रूग्ण अतिशय नाजूक अवस्थेत असल्याचेही दिसून येत आहेत. याचाच अर्थ आताचा कोरोना विषाणू हा कित्येक पटीने शक्तिशाली असून झपाट्याने मानवी शरीरावर घातक करू लागला आहे.

यासंदर्भात बोलताना कोहिनूर रूग्णालयातील छातीरोग तज्ज्ञ डॉ. राजरतन सदावर्ते यांनी सांगितले की, ‘‘आधी रूग्णाच्या फुफ्फुसात हळुहळु बदल दिसून येत होतो. परंतु, आता फुफ्फुस लवकर खराब होत आहेत. हे विषाणू सर्व आजारांपेक्षा भयंकर असून फुफ्फुस खराब झाल्यावर रूग्ण उपचारासाठी येत आहेत. अशावेळी रूग्णांवर उपचार करणं डॉक्टरांसाठी अवघड होत आहे. रूग्णालयात उपचारासाठी येणाऱ्या रूग्णांचे एक्स-रे रिपोर्टमध्ये फुफ्फुसाची स्थिती खूपच वाईट आहे. या रूग्णांना श्वास घ्यायला त्रास होत होता. यातील बहुतेक रूग्ण वयोवृद्ध आणि कुठला ना कुठला आजार असणारे आहेत.’’

‘‘ताप, सर्दी, घशात खवखव हिच लक्षणं कोरोना रूग्णांमध्ये दिसून येत आहे. परंतू अजूनही लोक या लक्षणांमध्ये दुर्लक्ष करतात. अनेक लोक विनामास्क रस्त्यांवर फिरत आहे. फक्त लोकांच्या निष्काळजीपणामुळे कोरोना विषाणूंचा प्रसार वाढतोय. याशिवाय मधुमेह, उच्चरक्तदाब, हृदय आणि किडनीचे विकार असणाऱ्या रूग्णांना या विकाराचा धोका सर्वाधिक असल्याने या नव्या कोरोना विषाणूंपासून वाचवण्यासाठी त्यांनी आरोग्याची काळजी घेणं गरजेचं आहे,’’ असेही डॉ. सदावर्ते म्हणाले.