ओमकार बिल्डर्सचा SRA, मनी लॉन्ड्रिग घोटाळा ! कंपनीच्या संचालक अन् अध्यक्षांचा जामीन अर्ज उच्च न्यायालयानं फेटाळला

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन –   मुंबई उच्च न्यायालयाने मुंबईतील प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक आणि ओमकार ग्रुपचे बाबुलाल वर्मा आणि कमल गुप्ता यांचा जामीन अर्ज फेटाळला आहे. २२ हजार कोटींच्या आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी या दोघांना ईडीकडून अटक करण्यात आली होती. मुंबईतील मोठ्या झोपडपट्टी पुनर्वसन योजनांशी संबंधित विकासक समुहांमध्ये ओमकार समुहाचा समावेश आहे. या याचिकेची सुनावणी न्यायमूर्ती अजय गडकरी यांच्यासमोर करण्यात आली.

मुंबईमधील बिल्डर आता ईडीच्या रडारवर आले आहेत. मागील काही दिवसांत ईडीने मुंबईसह आसपासच्या भागांतील बड्या बिल्डर्सवर धाडी टाकल्या आहेत. विकासक आणि राजकीय नेते यांचं नेहमीच सौख्य असल्याचे पाहायला मिळते. तेव्हा आता ईडी बिल्डरांच्या माध्यमातून काही राजकीय नेत्यांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न असल्याचे संकेत मिळत आहे. काही महिन्यांपूर्वी मुंबईतील जे. पी. इन्फ्रास्ट्रक्चरवर धाड टाकून ईडीने काही कागदपत्रे आणि इलेक्ट्रॉनिक साहित्य जप्त केले होते. आपला पैसा गुंतवण्यासाठी बांधकाम क्षेत्र हे सर्वात उपयुक्त क्षेत्र मानले जाते. त्यामध्ये आपला नफा १० पटीने होतो आणि आपले नावसुद्धा समोर येत नाही. तसेच नुकसान होण्याची पण शक्यता फार कमी असते. त्यामुळे या क्षेत्रात मोठ्या प्रमाणात उलाढाल होत असते.

काय आहे प्रकरण?

झोपडपट्टी पुनर्वसन योजनेच्या नावावर २२ हजार कोटी रुपयांची अफरातफर केल्याप्रकरणी ईडीने आपला तपास सुरु केला असे सूत्रांकडून म्हंटले आहे. ओमकार समूहाने विविध बँकांकडून हजारो कोटींचे कर्ज तर येस बँकेकडून ४५० कोटींचे कर्ज घेतले आहे. तसेच हे पैसे इतरत्र वळवल्याचा आरोप करण्यात आला आहे. सुराणा ग्रुपच्या औरंगाबाद येथील ओमकार समुहावर ४१० कोटी रुपयांच्या आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. काही दिवसांपूर्वी ईडीने ओमकार समूहाच्या १० जागांवर धाड टाकली होती. तेव्हा या प्रकरणात कमल गुप्ता आणि बाबूलाल वर्मा यांना अटक करण्यात आली होती. एवढेच नाहीतर 22 हजार कोटींच्या प्रकरणी सुद्धा ओमकार ग्रुपच्या अडचणीत वाढ होऊ शकते. कोर्टात या प्रकरणी याचिका दाखल करण्यात आली असून कोर्टाने या प्रकरणाचा तपास करण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार ईडीकडून तपास सुरु करण्यात आला आहे.