खारघर हत्या प्रकरण : ‘नशेत होतो, त्या रात्री काय घडले आठवत नाही’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – थर्टी फर्स्टच्या रात्री खारघरमध्ये जान्हवी कुकरेजा (वय 19) या विद्यार्थिनीची हत्या केल्याच्या आरोपाखाली पाेलिसांनी दोघांना अटक केली आहे. त्यांच्याकडे हत्येबाबत चौकशी केली असता, त्या रात्री आपण नशेत असल्याने काय घडले याबाबत आपल्याला काहीही आठवत नसल्याचे दोघांनीही पोलिसांना सांगितले.

श्री जोगधनकर आणि दिया पडळकर असे पोलिसांनी अटक केलेल्यांची नावे आहेत. हे दोघेही तिचे जवळचे मित्र आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, जान्हवीची हत्या झाली त्या दिवशी संध्याकाळी साडेसात वाजेपर्यंत जोगधनकर व दिया हे तिच्या घरी वडिलांचा वाढदिवस साजरा करत होते. खारघरमधील भगवती हाईट्स इमारतीच्या टेरेसवर 31 डिसेंबरच्या रात्री सुरू असलेल्या पार्टीत जवळपास 12 जण सहभागी झाले होते. श्री हा अन्य मुलींच्या जवळ जात होता हे जान्हवीला आवडत नव्हते. त्यातच तिने त्याला दियासोबत आक्षेपार्ह अवस्थेत पाहिले. यावरून त्यांच्यात वाद झाला. दोघांनी तिला बेदम मारहाण केली. केसांना धरून शिड्यांवरून फरफटत नेले, अशी माहिती आहे. मात्र याला अद्याप अधिकृत दुजोरा मिळालेला नाही. दरम्यान, जान्हवीचे डोके रेलिंगला जोरात आपटल्याने तिच्या कवटीला दुखापत झाली आणि वेळेत उपचार मिळू न शकल्याने तिचा मृत्यू झाल्याचे उघड झाले आहे. मारहाणीनंतर दिया आणि श्री हे उपचारासाठी वेगवेगळ्या दवाखान्यांत निघून गेले.

… तर माझी मुलगी वाचली असती, आईला अश्रू अनावर
जान्हवीचे मित्र तिला पार्टीसाठी घेऊन गेले आणि 5 वाजता मला तिच्या मृत्यूची बातमी समजली. तिने सव्वादोनच्या सुमारास अखेरचा श्वास घेतला, तोपर्यंत ती रक्ताच्या थारोळ्यात पडली होती. पण, एकानेही याबाबत आम्हाला कळविले नाही. वेळेत उपचार मिळाले असते तर माझी मुलगी वाचली असती. उच्च शिक्षणासाठी विदेशात जाण्याची तयारी करणारी माझी मुलगी आम्हाला कायमची सोडून गेली, असे जान्हवीची आई निधी कुकरेजा यांनी खार पोलीस ठाण्याजवळ रडतच सांगितले.