राष्ट्रवादीनं राज्यपालांना पाठवली संविधानाची प्रत ! करून देणार ‘ही’ जाणीव

ठाणे : पोलीसनामा ऑनलाईन – संविधानिक पदावर विराजमान असतानाही संविधानानं सांगितलेल्या धर्मनिरपेक्ष तत्वांचा विसर राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांना पडला आहे असा आरोप करून राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तथा गृहनिर्माण मंत्री डॉ जितेंद्र आव्हाड यांच्या मार्गदर्शनाखाली तसचं ठाणे शहराध्यक्ष आनंद परांजपे यांच्या नेतृत्वाखाली प्रदेश सरचिटणीस तथा ज्येष्ठ नगरसेवक सुहास देसाई यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसनं राज्यपालांना बुधवारी संविधान तसंच प्रस्ताविकेची लॅमिनेट प्रत स्पीड पोस्टानं पाठवली.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून हिंदुत्ववादी असूनही गेल्या काही महिन्यांपासून राज्यातील देवदेवतांना बंदित ठेवलं आहे. प्रार्थनास्थळं बंद ठेवण्याबाबत तुम्हाला दैवी संकेत मिळत आहेत की तुम्ही अचानक धर्मनिरपेक्ष बनला आहात असा सवाल राज्यपालांनी केला होता. त्यांच्या या भूमिकेचा राष्ट्रवादी काँग्रेसनं निषेध केला आहे. राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी बुधवारी ठाणे शहराच्या प्रमुख टपाल कार्यालयात एकत्र येऊन संविधानाचा विजय असो अशा घोषणा देऊन राज्यपालांना संविधानाची प्रत स्पीड पोस्टद्वारे पाठवली. यावेळी आनंद परांजपे यांनी सांगितलं की, महामहिम राज्यपालांना आम्ही भारतीय संविधान सविनय सादर करत आहोत. राज्यपाल हे संविधानिक पद आहे. कदाचित त्यांना या संविधानाचा विसर पडला असेल की काय म्हणूनच भारतीय प्रस्ताविका त्यांना पाठवत आहोत.

यावेळी राष्ट्रवादीच्या महिला शहराध्यक्षा सुजाता घाग, विक्रम खामकर, विधानसभा अध्यक्ष विजय भामरे, विधानसभा कार्याध्यक्ष विक्रांत घाग, सामाजिक न्याय विभागाध्यक्ष कैलास हावळे, सरचिटणीस रविंद्र पालव आदी उपस्थित होते.