Video : … तर बलात्कार टळला असता, महिला आयोगाच्या सदस्या चंद्रमुखी देवींचे वादग्रस्त विधान

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – उत्तर प्रदेशातील (UP) बदायू येथील बलात्कारप्रकरणी, ‘ती’ महिला जर संध्याकाळच्या वेळी एकटी घराबाहेर पडलीच नसती तर ही घटना टाळता आली असती, असे वादग्रस्त वक्तव्य राष्ट्रीय महिला आयोगाच्या सदस्य चंद्रमुखी देवी ( Chandramukhi Devi) यांनी केले आहे. दरम्यान चंद्रमुखी देवी यांच्या वक्तव्यावर आता चौफेर टीका होऊ लागली आहे. राष्ट्रीय महिला आयोगाच्या अधक्षा रेखा शर्मा यांनी देखील सारवासारव करत त्या वादग्रस्त व्यक्तव्याशी आपण सहमत नसल्याचे स्पष्ट केले आहे. त्यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून, राष्ट्रीय महिला आयोगाचा असा दृष्टिकोन नाही. मी या वक्त्यव्याचा निषेध करते, असे म्हटले आहे.

बदायुमध्ये दि. 3 जानेवारी रोजी संध्याकाळी एक 50 वर्षीय महिला शनिवारी मंदिरात गेली होती. त्यावेळी महंत आणि त्याच्या दोन अनुयायींनी तिच्यावर पाशवी बलात्कार करून तीची हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली होती. या प्रकरणी तिघांनाही अटक केली आहे. या महिलेच्या कुटुंबियांची भेट घेण्यासाठी महिला आयोगाने चंद्रमुखी देवी यांना पाठवले होते. ‘जर संध्याकाळच्या वेळी ती घराबाहेर पडली नसती तर किंवा तिच्या कुटुंबातील एखाद्या मुलाला सोबत घेऊन गेली असती, तर बलात्काराची ही घटना टाळता आली असती. तिला फोन करून बोलावून घेतले होते, त्यावरून हा प्रकार पूर्वनियोजित होते, हे लक्षात येते. तरीही ती गेली आणि अशा अवस्थेत ती परतली,’ अशी मखलाशीही देवी यांनी केली आहे. त्या महिलेच्या कुटुंबीयांची भेट घेतल्यानंतर पत्रकारांशी त्या बोलत होत्या.

राष्ट्रीय महिला आयोगाच्या अधक्षा रेखा शर्मा यांनीच देवी यांना त्या महिलेच्या कुटुंबीयाची भेट घेण्यासाठी पाठवले होते. एका संदेशात त्यांनी, ‘देवी यांनी हे वक्तव्य कसे आणि का केले, माहीत नाही. पण प्रत्येक महिलेला तिच्या मर्जीने कुठेही आणि केव्हाही जाण्याचा अधिकार आहे. महिलांना कोणत्याही स्थानावर सुरक्षित वाटावे, याची जबाबदारी समाज आणि राज्य सरकारची आहे, असे म्हटले आहे.

दरम्यान या महिलेचा शवविच्छेदनाचा अहवाल आला असून गुप्तांगामध्ये जखमा झाल्या आहेत. तर अतिरक्तस्रावामुळे मृत्यू झाल्याचे धक्कादायक सत्य समोर आले आहे. प्रथमदर्शनी पुराव्यावरून हा बलात्कार असल्याचे बदायूंचे मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. यशपाल सिंग यांनी स्पष्ट केले. बदायू पोलिस प्रमुख संकल्प शर्मा यांनी याप्रकरणी स्थानिक पोलिसांकडून हलगर्जीपणा झाल्याचे मान्य केले आहे.