‘मोदी सरकार’ दिल्लीत स्थापन झाल्यापासून सिलिंडरच्या दरांत दुप्पट वाढ !

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – गेल्या काही दिवसापासून इंधनदरात वाढ झाली आहे. इंधन दरांनी शंभरी पार केली आहे. त्याच बरोबर सिलिंडरच्याही दरांत टप्याटप्याने वाढ करण्यात आली आहे. सिलिंडरच्या दारात मोदी सरकारने तब्बल २०० केली आहे. या दरवाढीचा रोष सोशल मीडियावर व्यक्त होताना दिसत आहे. त्यातच पेट्रोलियममंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी मोदीसरकार स्थापन झाल्यापासून म्हणजे २०१४ पासून सिलिंडरच्या दरांत दुप्पट वाढ झाली आहे तर इंधनावरील करसंकलनात ४५९ टक्क्यांनी वृद्धी झाली असल्याची कबुली दिली आहे. आधीच दरवाढीचे चटके सर्वसामान्य सोसत असताना पेट्रोलियममंत्र्यांनी दिलेली कबुली म्हणजे आगीत तेल ओतल्यासारखे झाले आहे.

काय म्हणाले धर्मेंद्र प्रधान ?
१ मार्च २०१४ रोजी १४ किलो वजनाच्या घरगुती वापराच्या सिलिंडरचा दर ४१०.५० रुपये होता
सिलिंडर आणि रॉकेल यांच्या किमतीत गेल्या दोन वर्षांत सातत्याने किरकोळ वाढ होत असल्याने त्यावरील अनुदान कमीकमी होत चालले आहे. स्वस्त धान्य दुकानांतून (रेशन) मिळणाऱ्या रॉकेलची किंमत २०१४ च्या मार्च महिन्यात १४.९६ रुपये प्रतिलिटर एवढी होती. मात्र, तीच किंमत यंदाच्या मार्च महिन्यात ३५.३५ रुपये एवढी झाली आहे.

दरम्यान, मुंबईमध्ये पेट्रोल आणि डिझेलच्या किमती अनुक्रमे ९७.५७ आणि ८८.६० रुपये प्रतिलिटर एवढ्या आहेत. तेल उत्पादक कंपन्यांकडे देशांतर्गत इंधनाचे दर ठरविण्याची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. इंडियन ऑइल, भारत पेट्रोलियम यांसारख्या कंपन्या दर महिन्याच्या १ आणि १५ तारखेला इंधनाच्या किमती ठरवतात. १९ ऑक्टोबर २०१४ रोजीपासून या कंपन्या दर ठरवत असतात. या किमतींमध्ये आंतरराष्ट्रीय बाजारातील दरांनुसार चढ-उतार होत असतो