‘पंगना’ राणावत म्हणत शिवसेनेनं कंगनाला डिवचलं

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – अभिनेता सुशांतसिंह राजपूत (Sushant Singh Rajput) आत्महत्या प्रकरणानंतर अभिनेत्री कंगना राणौत (Actress Kangana Ranaut) चर्चेत आली. सुशांतच्या प्रकरणावर बोलताना तिने मुंबई आणि मुंबई पोलिसांविषयी (Mumbai Police) केलेल्या वक्तव्यावरुन शिवसेना आणि कंगना यांच्यात चांगलाच वाद झाला. कंगना आणि शिवसेना (Shivsena) यांच्यातील वाद काहींसा कमी होताना पहायला मिळत असताना शिवसेनेचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी पुन्हा एकदा कंगनाला डिवचत तिचा उल्लेख ‘पंगना’ असा केला आहे. आता कंगना कशा पद्धतीने प्रत्युत्तर देते हे पहावे लागेल.

संजय राऊत यांनी रोखठोकमधून मोदी सरकारवर टीकास्त्र सोडलं आहे. मध्य प्रदेशात काँग्रेस फोडून भाजपने सरकार बनवलं. बिहारात तेजस्वी यादव या तरुणाने आव्हान उभे केले. काश्मीर खोऱ्यात अस्थिरता कायम आहे. लडाखमध्ये चीन घुसलेलाच आहे. पंजापच्या शेतकऱ्यांवर जोरजबरदस्तीचे प्रयोग सुरु आहेत. पंगना राणावत व अर्णब गोस्वामीला वाचवण्यासाठी केंद्र सरकार जमिनीवर उतरले आहे. मुंबईची मेट्रो राजकीय अहंकारासाठी अडवून ठेवली. राजकीय साठमारीत आपण जनतेचे नुकसान करतो याचे भान देखील केंद्रातील सत्तेने ठेवले नसल्याचे सांगत राऊत यांनी केंद्रावर जोरदार हल्लाबोल केला.

संजय राऊत यांनी पुढे म्हटले की, केंद्रातील सत्तेने भान ठेवले नाही तर रशियातील राज्ये फुटली तसे आपल्या देशात घडायला वेळ लागणार नाही. केंद्र सरकारच्या क्षमतेवर आणि विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह निर्माण करणारे वर्ष म्हणून 2020 कडे पहावे लागेल असे संजय राऊत यांनी म्हटले आहे.

नव्या वर्षाच्या शुभेच्छा देताना लोकांना एकच विनंती…

प्रत्यक उगवत्या वर्षाने आशेची किरणे दाखवली, मात्र ती किरणेही शेवटी निराशेच्या अंधारात गडप झाली. आता नव्या वर्षाच्या शुभेच्छा देताना सामान्य लोकांना एकच विनंती करायची आहे, झालं ते पुरे झालं. मानसिक अस्थिरता, अशांतता यांनी भरलेलं हे 2020 साल फार वेगाने निघून गेलं आणि मावळत्या वर्षाने काही चांगलं पेरून न ठेवल्यामुळे येणारे 2021 हे वर्ष कसे जाईल त्याचा भरवसा नाही. लोकांनी स्वत:चे कुटुंब वाचवण्याचा प्रयत्न करावा, बाकी जग सुरुच राहणार आहे, असे आवाहन संजय राऊत यांनी केलं.