…तर कोरोनाची दुसरी लाट अजून ओसरलेली नाही; सरकारकडून धोक्याचा इशारा

नवी दिल्ली : वृत्तसंस्था –   भारतात यंदाच्या कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने धुमाकूळ घातला आहे. आताच्या काही दिवसात बाधितांची संख्या कमी होत आहेत. मागील काही दिवसांपासून देशात दररोज ४ लाखांपेक्षा कमी रुग्ण आढळून येत आहेत. दुसरी लाट ओसरली असल्याचा अंदाज वर्तवण्यात येऊ लागला. परंतु, देशात विषाणूचा धोका हा कायम आहे. तर कोरोनाची दुसरी लाट अजून ओसरलेली नाही, असे नीती आयोगाचे सदस्य डॉ. व्ही. के. पॉल यांनी म्हटलं आहे.

डॉ. व्ही. के. पॉल यांनी अशी माहिती दिली आहे की, कोरोना विषाणूची दुसरी लाट संपलेली नाही. या लाटेने अजून टोक गाठायचं आहे. देशात कोरोना पुन्हा एकदा रौद्र रुप धारण करू शकतो. कोरोनाचा पुढचा धोका ओळखून राज्यांच्या मदतीने राष्ट्रीय स्तरावर आरोग्य बाबतच्या सुविधा आणखी मजबूत करायला हव्या आहेत. म्हणून नागरिकांना योग्य वेळी उपचार मिळू शकतील. असे पॉल यांनी सांगितले आहे. तसेच, सरकारला दुसऱ्या लाटेची माहिती नव्हती हा आरोप चुकीचा आहे. आम्ही विविध व्यासपीठांच्या द्वारे दुसऱ्या लातेबाबत नागरिकांना जागरुक करण्याचा प्रयत्न करत होतो, असे देखील त्यांनी म्हटले आहे.

कोरोनाची दुसरी लाट येईल असा अंदाज आम्ही वर्तवला होता. त्या माध्यमातून आम्ही सतर्कतेच्या सूचना सुद्धा केल्या होत्या, देशात आताच्या घडीला सिरो पॉझिटिव्हिटी २० टक्के असून ८० टक्के लोकसंख्या कोरोनाच्या जाळ्यात सापडू शकते, असा धोक्याचा इशारा पॉल यांनी दिला आहे. तसेच १७ मार्चला पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशाला संबोधित करताना भारतात कोरोनाची दुसरी लाट आल्याचे त्यावेळी त्यांनी म्हटले होते. लोकांनी घाबरण्याचं नाही, तर सुरक्षित राहण्याची आवश्यकता असल्याचं पंतप्रधान मोदींनी म्हटलं होतं याची आठवण देखील पॉल यांनी करून दिलीय.

या दरम्यान, मे महिन्याच्या पहिल्याच दिवशी देशात ४ लाखांहून अधिक कोरोना रुग्ण आढळून आले. त्यानंतर ही संख्या कमी होताना दिसत आहे. मात्र, हा कोरोना विषाणू कधीही रौद्ररुप धारण करू शकतो. आम्हाला या गोष्टींची कल्पना आहे. त्यामुळे भारतात तयारी सुरू आहे. तसेच, आरोग्य सुविधांवर विशेष लक्ष दिले जात आहे, असे सांगत, नागरिकांनी कोरोनाच्या प्रतिबंधात्मक नियमाचे व्यवस्थित पालन केले पाहिजे. यामुळे नागरिक जास्तीतजास्त सुरक्षित राहतील अशी याबाबत माहिती डॉ. व्ही. के. पॉल यांनी दिली आहे.