अमरावती जिल्ह्यातील रखडलेल्या सिंचन प्रकल्पांना मिळणार गती – जलसंपदामंत्री जयंत पाटील

अमरावती : पोलीसनामा ऑनलाइन – अमरावती जिल्ह्यातील सिंचन प्रकल्पांना गती मिळणार असल्याची माहिती राज्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी दिली आहे. जलसंपदा विभागाच्या सिंचन भवनात गुरुवारी आयोजित आढावा बैठकीत ते बोलत होते. जिल्ह्यात सिंचन प्रकल्प रखडला होता त्याला आता गती मिळणार आहे. जयंत पाटील यांनी जलसंपदा विभागाचे सचिव संजय घाणेकर यांना व्हिडीओ कॉलवर जिल्ह्यातील प्रकल्पांना गती मिळण्यासाठी ज्या काही अडचणी असतील त्या तातडीने दूर करण्याच्या सूचनाही दिल्या आहेत.

या दरम्यान, निम्नपेढी, चंद्रभागा बॅरेज, वासनी, गर्गा, तसेच इतर लघु व मध्यम प्रकल्पांचा आढावा मुख्य अभियंता यांच्याकडून घेतला. तसेच भातकुली तालुक्यातील निम्नपेढी प्रकल्पांचा प्रश्न न्यायप्रविष्ठ असून, न्यायालयाने या प्रकल्पाला स्थगिती दिली आहे. चांगला वकील शासनाने नेमून न्यायालयाने दिलेले स्टे उठविण्यासाठी प्रयत्न करावा, अशी मागणी आमदार सुलभा खोडके यांनी यावेळी पाटील यांच्याकडे केली. याबाबत त्यावर चांगला वकील नेमण्याची कारवाई सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच पाटील यांनी चंद्रभागा बॅरेजच्या पुनर्वसनासाठी पाठपुरवा करण्याचा आणि वासनी, चंद्रभागा प्रकल्पांच्या सुधारित प्रशासकीय मान्यतेच्या प्रश्नासाठी गती वाढवा. अशा सूचना सचिवांना यावेळी त्यांनी दिल्या आहेत.

दयार्पूर मतदारसंघाचे आमदार बळवंत वानखडे यांनी भुलेश्वरी नदीवर नव्याने मध्यप्र प्रकल्प करण्यात यावे, अशी मागणी जलसंपदा मंत्र्यांकडे करण्यात आले. मात्र मध्यम प्रकल्पाऐवजी लघु प्रकल्प होऊू शकतो. उपलब्ध पाण्यानुसार आखणी करावी, अशा सूचनाही त्यावेळी अधिकाऱ्यांना दिल्या. तसेच कालाडोह प्रकल्पांच्या ठिकाणी पर्यटन विकास करा, वासनी प्रकल्पांची उंची वाढविण्याची मागणी यावेळी आमदार वानखडे यांनी केली. तसेच चांदूररेल्वे तालुक्यातील कोहळ व सोनगाव शिवणी लघु प्रकल्पाच्या कालवा कार्यान्वित करा, अशी मागणी माजी आमदार वीरेंद्र जगताप यांनी केली. सदर कालव्यांचे ट्रायल घेण्याच्या सूचना यावेळी अधिकाऱ्यांना मंत्री जयंत पाटील यांनी मंत्र्यांनी दिल्या आहेत.