अरे देवा ! पोलिसांनी चक्क मृत व्यक्तीलाच दिली नोटीस, म्हणाले – ‘दंडाची रक्कम घेऊन कोर्टात पोहचा’

उत्तरप्रदेश : वृत्तसंस्था – उत्तरप्रदेश राज्यातील हरदोई जिल्ह्यात पोलीसांचे एक वेगळेच प्रकरण उघडकीस आले आहे. या जिल्ह्यात पोलिसांना जिवंत व्यक्तींप्रमाणे मृत व्यक्तीची देखील शांती भंग करेल म्हणून दहशत वाटते. म्हणून येथील पोलिसांनी अशा एका व्यक्तीला शांती भंग केल्याच्या कलमाद्वारे नोटीस पाठवली आहे. परंतु त्या व्यक्तीचा तीन वर्षांपूर्वीच मृत्यू झाला आहे. आणि त्या मृत व्यक्तीलाच दंडाधिकारीसमोर हजर राहण्याचे आदेश दिले आहेत. या कारणामुळे जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. त्या भागात क्षुल्लक वादविवादानंतर मृत व्यक्तीवर पोलिसांनी कारवाई केल्याची धक्कादायक माहिती उघडकीस आली आहे. हे प्रकरण उघडकीस आल्यानंतर पोलीस अधिकाऱ्यांनी संबंधित पोलीस ठाण्याच्या पोलिसांना केलेल्या हलगर्जीपणाबाबत उत्तर मागितले आहे.

अधिक माहितीनुसार, हरदोई जिल्ह्यातील बघौली पोलीस ठाण्याच्या हद्दीत निभि गावात राहणारे राम आसरे यांच्या घरी पोलिसांनी नोटीस धाडली. या नोटिशीत नऊ जणांच्या नावाचा समावेश होता. राम आसरे, नरेश, हरिश्चंद्र, रती सिंह, राघवेंद्र, सतीश, गुड्डू, लवकुश आणि अशोक यांची नाव नोटिशीत आहेत. या नोटीसमध्ये नाव लिहिलेल्या सर्व व्यक्तींनी प्रत्येकी ५० हजारांची जामिनाची रक्कम प्रतिज्ञापत्र घेऊन उपजिल्हा दंडाधिकाराच्या कोर्टात ६ फेब्रुवारीला हजर राहण्याचे आदेश देण्यात आले होते. नोटीसमध्ये तिसऱ्या क्रमांकावर लिहिलेल्या नावाची व्यक्ती (हरिश्चंद्र) ३ वर्षांपूर्वी मृत झाली आहे. ही नोटीस मिळाल्यानंतर कुटुंबातील सदस्य हैराण झाले आहेत.

तीन वर्षांपूर्वी मृत झालेल्या व्यक्तीला उपजिल्हा दंडाधिकाराच्या कोर्टात कसं हजर करायचं. हे बघून बघौली पोलीस ठाण्याचा हलगर्जीपणा जेव्हा समोर आला, तेव्हा संपूर्ण प्रकार उघडकीस आले. या दरम्यान पोलिसांच्या उच्च अधिकाऱ्यांनी संपूर्ण प्रकरणाची गांभीर्याने दखल घेऊन प्रभारी पोलीस निरीक्षकास याबाबत स्पष्टीकरण मागितले. हरदोई पोलीस ठाण्याचे एसीपी अनिल कुमार यांचं म्हणणं आहे की, बघौलीच्या निभी गावातील राम आसरे आणि रविशंकर यांचं भांडण झालं, त्यावरून पोलिसांनी ९ जणांवर चलान फाडले. त्यापैकी एका व्यक्तीचा मृत्यू झाला होता. अशी त्यांनी माहिती दिली आहे.