चंद्रयान – 2 : जगभरातील प्रसार माध्यमांकडून इस्त्रोच्या वैज्ञानिकांचं ‘कौतुक’ ! सर्व काही संपलं नाही

नवी दिल्ली  : वृत्तसंस्था  – 22 जुलै रोजी श्रीहरिकोटा येथील प्रक्षेपण केंद्रावरून झेपावलेले चांद्रयान-2 अनेक महत्त्वाचे टप्पे पार पाडत चंद्राजवळ पोहोचले. मात्र, चांद्रयान अवघे 2.1 कि.मी.वर असताना विक्रम लँडरशी असलेला संपर्क तुटला. भारताच्या चांद्रयान-2 मोहिमेची जगभरातील माध्यमांनी प्रामुख्याने दखल घेतली आहे.  त्याबद्दल भारतातूनच नव्हे तर जगभरातून इस्रोचे कौतुक होत आहे.

चंद्रावर उतरणाऱ्या विक्रम लँडर आणि त्यातील विक्रम रोव्हरचा तुटलेला संपर्क हा भारताच्या अवकाश कार्यक्रमासाठी एक झटका आहे. चांद्रयान-2 चा लँडर मार्गावरुन भरकटलेला असला तरी मोहिमेसाठी सर्व काही संपलेले नाही असे अमेरिकन मॅगझिन वायर्डच्या ऑनलाइन एडिशनने म्हटले आहे.

न्‍यूयॉर्क टाइम्‍स –
न्‍यूयॉर्क टाइम्‍सने देखील भारताच्या या मिशनचे कौतुक केले आहे. न्‍यूयॉर्क टाइम्‍सने म्हंटले आहे की , ‘ चांद्रयान-2 चा लँडर चंद्रावर उतरु शकला नसला तरी ते अंशत: अपयश आहे. ऑर्बिटर कार्यरत राहणार आहे. फक्त चंद्रावर पोहोचणाऱ्या देशांच्या पंक्तीत पोहोचायला भारताला थोडा वेळ लागेल. ‘

द गार्डियन –
ब्रिटिश वृत्तपत्र द गार्डियन ने म्हंटल आहे की , संपर्क तुटल्याने चंद्रयान-2 ला शेवटच्या टप्प्यात अपयश मिळाले. विक्रम लँडरचे लँडिंग यशस्वी ठरले असते तर भारत चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर पोहोचणारा पहिला देश ठरला असता. भारत अशा ठिकाणी पोहचत आहे जिथे येणाऱ्या काळात मानववस्ती बनवली जाऊ शकते.

वॉशिंग्टन पोस्ट –
वॉशिंग्टन पोस्ट आपल्या  आर्टिकलमध्ये म्हंटले आहे की , ‘चंद्रावर लँडिंगची प्रक्रिया सुरु असताना भारताचा लँडर बरोबर संपर्क तुटला. भारताच्या वाढत्या अवकाश महत्वकांक्षेला हा धक्का आहे.  मात्र या  मिशनमध्ये  जे यश मिळालं आहे ते देशाच्या तरुणाच्या स्वप्नांना बळ देण्याचं , साकार करण्याचं जिवंत उदाहरण आहे.