यवत : शेतकऱ्याचा आगीत होरपळून मृत्यू

यवत : पोलीसनामा ऑनलाइन –   उसाच्या शेतात लागलेली आग विझवण्यासाठी गेलेल्या शेतकऱ्याचा आगीत होरपळून मृत्यू झाल्याची घटना घडली़ ही घटना खामगाव (ता़ दौंड) येथे मंगळवारी दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास घडली़ लक्ष्मण उद्धव शिंदे (वय ५८ , रा.नाथाची वाडी , ता.दौंड) असे मृत्यू झालेल्या शेतकऱ्याचे नाव आहे़

खामगाव येथील लक्षमण शिंदे, अनिल नागवडे यांचे एकमेकांच्या शेजारी खंडाने शेती करत होते़ लक्ष्मण शिंदे हे ज्योत्स्ना होले (रा.यवत , ता.दौंड) यांच्या मालकीची शेती खंडाने करत होते. तर नागवडे त्यांच्या शेजारील गटामध्ये शेती खंडाने करत होते.दोघांच्या शेतामध्येही उसाचे पीक होते़ लक्ष्मण शिंदे यांच्या शेतातील ऊस तोडला होता़ तोडलेला ऊस नेहल्यानंतर उरलेले पाचट मंगळवारी जाळत असताना पेटते पाचट बाजूच्या शेतात गेल्याने नागवडे यांच्या ऊसाला आग लागली़ आग लागल्याचे लक्षात येताच लक्ष्मण शिंदे यांनी आग लागलेल्या दिशेने धाव घेत आग विझवण्याचा प्रयत्न केला़ दरम्यान, घटनास्थळी अनिल नागवडे आल्यानंतर त्यांना लक्ष्मण शिंदे भाजलेल्या अवस्थेत मिळून आले़ नागवडे यांनी त्यांना तत्काळ रुग्णालयात दाखल केले़ मात्र, वैद्यकीय अधिकाऱ्यांनी उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे सांगितले़ अनिल नागवडे यांनी यवत पोलीस ठाण्यात खबर दिली आहे.