अर्जुनाच्या हाती बाण आला की वध दानवाचा होणार : अर्जुन खोतकर

जालना : पोलीसनामा आॅनलाईन
जालना जिल्ह्यातील भाजपचे खासदार रावसाहेब दानवे यांच्याविरोधात लोकसभा निवडणूक लढवण्याच्या पार्श्वभूमीवर राज्याचे दुग्धविकास राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांनी अर्जुनाच्या हाती बाण आला की, वध दानवाचा होणार असे म्हणत भाजपा प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांना चांगलाच टोला लगावला आहे. तसेच यावेळी बोलताना खोतकर म्हणाले की गेल्या 30 वर्षापासून मी निवडणूक लढवत आहे. जालन्यातून सहा वेळा विधानसभा निवडणूक लढवली आहे. 2014 च्या लोकसभा निवडणुकीत भाजपला शिवसेनेने साथ दिली म्हणून भाजपला या ठिकाणी फायदा झाला. आता मात्र जालन्याचा मतदारसंघ हा शिवसेनेच्या विचारसरणीचा असून या ठिकाणी शिवसेनाच निवडणूक लढवणार आणि जिंकणार.

शिवसेनेने स्वबळावर लढण्याची घोषणा केल्यानंतर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आजपासून दोन दिवसांच्या मराठवाडा दाैऱ्यावर असून मराठवाड्यातील आठ लोकसभा मतदारसंघाचा आढावा घेत आहेत. त्यामुळे आगामी निवडणूकांच्या दृष्टीकोनातून सक्षम उमेदवार देण्याचा शिवसेनेचा प्रयत्न असणार आहे. उद्धव ठाकरे यांनी जालन्याला भेट देऊन त्या ठिकाणी पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली असून या बैठकीत उमेदवारांची चाचपणी केली असता, या मतदारसंघात रावसाहेब दानवे यांच्याविरोधात अर्जुन खोतकर यांच्या नावाची चर्चा असल्याची माहिती समोर आली आहे.