गरज पडल्यास नीळकंठ होऊन विष पचवू : उर्जित पटेल

मुंबई : वृत्तसंस्था
रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर उर्जित पटेल यांनी आज अखेर पंजाब नॅशनल बँकेतील घोटाळ्याबाबत मौन सोडले. गरज पडल्यास शंकराप्रमाणे नीळकंठ होऊन विष पचवू,अशी प्रतिक्रिया पटेलांनी दिली.

नीरव मोदीने 12 हजार कोटींपेक्षा जास्त रकमेचा चुना पंजाब नॅशनल बँकेला लावला आणि तो देशाबाहेर पळाला. हा देशाच्या भविष्यावरचा सगळ्यात मोठा दरोडा होता, असे म्हणत उर्जित पटेल यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. गांधीनगरमध्ये गुजरात राष्ट्रीय विद्यापीठाच्या कार्यक्रमात ते बोलत होते.
बँकिंग क्षेत्रातील प्रणाली सुधारण्यासाठी शंकराप्रमाणे नीळकंठ अवतार धारण करण्याचीही आमची तयारी आहे, असा पुराणकथेचा दाखला देत रिजर्व्ह बँकेच्या अधिकारांची जाणीव करून दिली.
रिझर्व्ह बँकेने हा घोटाळा आधीच पकडायला हवा होता, असं म्हटलं जाते त्यावर, एखादा बँक रेग्युलेटर फसवणूक पकडू शकत नाही किंवा थांबवूही शकत नाही, अशी कमकुवत बाजू देखील उर्जित पटेलांनी मांडली.
सरकारी बँकांतून होणारे घोटाळे आणि गैरव्यवहार थांबवण्यासाठी, तसंच दोषींना शिक्षा करण्यासाठी रिझर्व्ह बँकेला आणखी अधिकार देण्याची मागणी गव्हर्नर ऊर्जित पटेल यांनी व्यक्त केली.