डासांचा प्रादुर्भाव वाढला; राष्ट्रवादीकडून आयुक्तांना डास मारण्याची बॅट भेट

सांगवी : पोलीसनामा ऑनलाईन

सांगवी-पिंपळे भागातील नदीपात्रात असलेल्या पाण्यात मोठ्या प्रमाणात दुर्गंधी पसरलेली आहे. महापालिकेकडून मुळा आणि पवना नद्यांची साफसफाई होत नाही. त्याच बरोबर गटरांची कामे अर्धवटच राहिल्याने परिसरात मोठ्या प्रमाणात डासांचे साम्राज्य वाढले आहे. त्यामुळे येथील नागरिकांच्या आरोग्यास धोका निर्माण झाला आहे. प्रशासनाकडे वारंवार तक्रारी करूनही कोणतीच दखल घेतली जात नसल्यामुळे राष्ट्रवादीचे माजी नगरसेवक अतुल शितोळे आणि राजेंद्र जगताप यांच्या नेतृत्वात परिसरातील नागरिकांनी महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांना निवेदन देत डास मारण्याची बॅट भेट देण्यात आली.

आयुक्त श्रावण हर्डीकर यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, सांगवी पिंपळेगुरव परिसरात मुळा आणि पवना नदी आहे. या नदीची साफसफाई होत नाही त्याच बरोबर गटरांची अर्धवट कामे यामुळे या परिसरात डासांचा प्रादुर्भाव वाढला आहे. मलेरिया सारख्या साथीच्या आजाराने डोके वर काढले आहे. याला महापालिकेचा आरोग्य विभाग जबाबदार आहे. केंद्र आणि राज्य सरकारने स्वच्छ भारत अभियान राबविले आहे. लाखो रुपये जाहिराती, फलकबाजी,पत्रकबाजी यासाठी खर्च केले आहेत. प्रत्यक्षात मात्र स्वच्छता झालेली नाही. मुळा आणि पवना नदीमध्ये आज ही कारखान्याचे रासायनिक पाणी, त्याचबरोबर भूयारी गटार योजनेचे काम पूर्ण न झाल्याने मैला आणि सांडपाणी थेट पवना नदीत सोडण्यात येत आहे. रासायनिक पाणी आणि मैला मिश्रित पाण्यामुळे अनेक वेळा मासे मेल्याचेही आढळून आले आहे. नदीतील जीवनसृष्टी यामुळे नामशेष होण्याचा मार्गावर आहे. कासट पेपर मिल आणि पदमजी पेपर मिलचे पाणीही नदीत सोडले जाते. यामुळे मोठे प्रदूषण निर्माण होत आहे.

महापालिका प्रशासने याचा गांभीर्याने विचार केला नाही म्हणून आज हा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. सांगवी आणि पिंपळेगुरव ही दोन्ही गावे नदीकाठी आहेत. संपूर्ण शहराची घाण याठिकाणी येत असल्याने चंद्रमणीनगर, एस. टी. कॉलनी या भागात नदीतील पाण्यात दुर्गंधी पसरलेली आहे. शिवाय डासांचे साम्राज्य वाढल्यामुळे येथील नागरिकांच्या आरोग्यास मोठा धोका निर्माण झाला आहे. डासांचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी धुरिकरण आणि रासायनिक पावडर वापरली जाते. मात्र सांगवी-पिंपळेगुरव परिसरात याचा याचा कधीच वापर केला जात नाही. मग हा कागदोपत्री खर्च दाखविला जातो का? असा सवाल उपस्थित करण्यात आला आहे.

नदी सुधार प्रकल्पाचे पुढे काय झाले माहित नाही. मात्र आता नदी सुधार प्रकल्पाला गती देण्याची आवश्यकता आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे स्वच्छ भारत अभियान हे स्वप्न आहे. आपण स्वच्छतेकडे दुर्लक्ष केल्यास पंतप्रधानांचे स्वप्न हे केवळ कागदावरच राहील. त्यामुळे आपण स्वच्छतेकडे गांभीर्याने पहा आणि अपूर्ण गटाराची कामे पूर्ण करून नदी स्वच्छ करण्याचे कार्य हाती घ्या. तसे केले तरच स्वच्छ शहर आणि डास मुक्त शहर खऱ्या अर्थाने स्वच्छ भारत अभियानाचे सार्थक होईल असे निवेदनात म्हटले आहे.