राज्याच्या पणन मंत्र्याचे बेताल वक्तव्य

पोलीसनामा ऑनलाईन

देशासह राज्यातील अनेक मंत्री हल्ली काहीही अजब-गजब सल्ले देत आहेत. कांद्याच्या पडलेल्या भावामुळे शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी आलेले असताना महाराष्ट्र राज्याचे पणन मंत्री सुभाष देशमुख यांनी गजब सल्ला दिला आहे. ‘श्रीमंत व्हायचं असेल तर कांदे खाऊ नका’ असे त्यांनी म्हटले आहे.

जैन समाजाप्रमाणे कांदा खाऊ नका तुमची देखील उन्नती होईल असं बेताल वक्तव्य सुभाष देशमुखांनी केले आहे. इंदापूरमध्ये शेतकरी उत्पादक कंपन्यांमार्फत कांदा खरेदीच्या शुभारंभ कार्यक्रमात ते बोलत होते.

कांदा थोडा महाग झाला की लगेच कांद्याने डोळ्यात पाणी आणले असे लिहिले जाते. वर्षभर कांदा खाल्लाच नाही तर बिघडलं कुठे? जैन समाज तर कांदाच खात नाही, त्यामुळे त्यांनी आर्थिक प्रगती केली, तुम्ही कांदा खात असल्याने तुमची प्रगती झाली नाही असा अजब युक्तीवाद त्यांनी केला.

या वक्तव्यामुळे त्यांच्यावर टीकेला सुरवात झाली आहे. कांदा खरेदी शुभारंभातच कांदे खाऊ नका असे सांगितल्याने मंत्री महोदयाच्या मुक्ताफळांनी शेतकरी आचंबीत झाले आहेत.