स्त्री भ्रूणहत्या रोखण्यासाठी शासनातर्फे प्रभावी अंमलबजावणी – आरोग्यमंत्री

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन

गतवर्षी झालेल्या नागरी परीक्षणानंतर हजार मुलांमागे मुलींचा ९०४ एवढा दर असल्याचा अहवाल आहे. स्त्री भ्रूणहत्या रोखण्यासंदर्भात शासन प्रभावी अंमलबजावणी करीत आहे. ४१६ संशयित सोनोग्राफी केंद्राचा पाठपुरावा करीत आहोत. डिसेंबर २०१७ मध्ये ५८० खटले दाखल करण्यात आले आहेत. यापैकी ३२८ अंतिम आहेत. ९६ प्रकरणांत ११० लोकांना शिक्षा झाली. ९३ जणांना सश्रम कारावास, १७ प्रकरणात दंड ठोठावण्यात आला असल्याची माहिती आरोग्यमंत्री डॉ.दीपक सावंत यांनी आज विधानसभेत दिली.

डॉ. सावंत म्हणाले, नीती आयोगाच्या अहवालानुसार २०१२ ते २०१४ या वर्षांत देशातील २१ प्रमुख राज्यांपैकी १७ राज्यात मुलींच्या जन्मदरात घट झाली असून, महाराष्ट्र राज्याचा त्यात समावेश आहे. यानंतर नागरी सर्व्हे झाला यानुसार राज्यात दर हजारी ९०४ इतकी मुलींची संख्या असल्याचा अहवाल आला आहे.

२०११ ते २०१७ मध्ये स्त्री भ्रूणहत्या रोखण्यासाठी व संदर्भातील कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी टोल फ्री नंबर सुरू केला. ‘आमची मुलगी’ हे संकेतस्थळ सुरू केले. साधारण ९३७ तक्रारी आल्या ८७६ तक्रारीवर कारवाई पूर्ण केल्या असून, ८५ सोनोग्राफी मशीन सील केल्या आहेत. अधिकाऱ्यांकडून २०१८ पर्यंत ८ हजार ७३ सोनोग्राफी केंद्राची कायद्याअंतर्गत नोंदणी झाली आहे. त्याची तपासणी करण्यात आली असल्याची माहिती डॉ.सावंत यांनी दिली.