प्रसाद खाल्ल्याने ८० जणांना विषबाधा, १२ जणांचा मृत्यू

बेंगळुरू : वृत्तसंस्था –कर्नाटकातील चामराजनगर जिल्ह्यात प्रसाद खाल्ल्याने विषबाधा होऊन १२ जण मृत्युमुखी पडले, तर ८० जणांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यापैकी काहींची प्रकृती गंभीर आहे. हा प्रसाद खाल्लेले ६० कावळेही मृत्युमुखी पडले.

हनुर तालुक्यातील सुलवाडी किच्चुगुट्टी मरम्मा मंदिरात प्रसाद म्हणून ‘वेज पुलाव’ खाल्ल्यानंतर लोकांना विषबाधा झाली. कामगेरे, कोल्लेगल आणि मैसूरमधील विविध रुग्णालयांमध्ये लोकांना दाखल करण्यात आले आहे. या घटनेने परिसरात खळबळ माजली आहे.

चामराजनगरचे पोलीस अधीक्षक धर्मेंद्र कुमार मीना यांनीही विषबाधेच्या घटनेच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे. चामराजनगरच्या आरोग्य विभागाला आवश्यक ती सर्व साधन सामग्री पुरवण्यात आली असल्याची माहिती मंड्या तसेच मैसूरच्या डीएचओंनी दिली.

‘ही घटना माझ्या कामगेरे या गावात घडली आहे. ही घटना खूप दुर्दैवी आहे.’ अशी प्रतिक्रिया कर्नाटकचे मुख्यमंत्री एच. डी. कुमारस्वामी यांनी व्यक्त केली आहे.