सामनातून भाजपवर टीका करताना शिवसेनेने म्हटले आहे की, ऑगस्टा वेस्टलॅण्ड प्रकरणात दलाली मिळाली आहे व संबंधित आरोपी कितीही मोठे असले तरी त्यांना सोडता कामा नये व काँग्रेसला या प्रकरणाचा जाब द्यावा लागेल. पण ऑगस्टा वेस्टलॅण्ड प्रकरणात मिशेलने सोनिया गांधी व त्यांच्या काँग्रेसचे नाव घेतले म्हणून लोक राफेल विमान घोटाळा विसरतील असे कुणी समजू नये. सोनिया गांधी व त्यांचे सुपुत्र राहुल गांधी यांना २०१९ आधी घेरण्याचा हा प्रकार आहे.
महागाई, बेरोजगारी, नोटाबंदी, शेतकऱ्यांच्या आत्महत्या, राममंदिर हे विषय प्रचारातून मागे पडतील व मिशेल महाराजांचेच नामजप होईल असे दिसते. मिशेलने जसे सोनिया गांधींचे नाव घेतल्याचा दावा केला जातो, तसे राफेलप्रकरणी पंतप्रधान मोदी व अनिल अंबानींचे नाव थेट फ्रान्सचे माजी राष्ट्रपती ओलांद यांनी घेतले होते, हा घोटाळा काही हजार कोटींचा आहे व त्यात एका उद्योगपतीचे कल्याण झाले. म्हणजे राफेल विरुद्ध ऑगस्टा वेस्टलॅण्ड अशी ही लढाई आहे. सरकारी यंत्रणा दोनचार लोकांच्या टाचेखाली आहे व राजकीय विरोधकांना विविध प्रकरणांत गुंतवण्यासाठी यंत्रणेचा गैरवापर सुरू आहे, असे शिवसेनेने सामनातील अग्रलेखात म्हटले आहे.