न्यायालयाचा अवमान – ४५३ कोटी न भरल्यास अनिल अंबानींना तुरुंगवासाची भीती

नवी दिल्ली पोलीसनामा ऑनलाईन –  रिलायन्स समुहाचे अध्यक्ष अनिल अंबानी यांच्या अडचणींत वाढ झाली आहे. एरिक्सन इंडीयाने  दाखल केलेल्या न्यायालयाचा अवमानप्रकरणात सर्वोच्च न्यालालयाने अनिल अंबानी व दोन संचालकांना दोषी ठरवत ४ आठवड्यात एरिक्सनला ४५३ कोटी रुपये द्या. अन्यथा तीन महिने तुरुंगात जाण्यासाठी तयार राहा असे सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे. तसेच त्यांना प्रत्येकी १ कोटीचा दंड ठोठावत महिन्याभरात तो न भरल्यास एक महिन्यासाठी तुरुंगात जावे लागेल असे न्यायालयाने स्पष्ट केले आहे.

रिलायन्स ग्रुपचे प्रमुख अनिल अंबानी यांच्यासह रिलायन्स टेलीकॉमचे चेअरमन सतीश सेठ आणि रिलायन्स इन्फ्राटेलचे चेअरमन छाया विरानी यांचा यात समावेश आहे.

स्वीडनची इलेक्ट्रॉनिक उपकरण कंपनी एरिक्सनचे ५५० कोटी रुपये परत केले नाहीत. सर्वोच्च न्यायालयाने अंबानींना ही रक्कम १५ डिसेंबर २०१८ पर्यंत देण्याचे आदेश दिले होते. न्यायालयाने आदेश देऊनही त्यांनी पैसे दिले नाहीत म्हणून एरिक्सनने सर्वोच्च न्यायालयाचा अवमान केल्याप्रकऱणी न्यायालयात धाव घेतली होती. आपली भरपाई करण्यासाठी अनिल अंबानी आणि त्याच्या कंपनीविरोधात सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली. रिलाएन्स समुहाकड़े राफेल करारासाठी पैसे आहेत. परंतु आमचे थकित पैसे अदा करण्यात ते अपयशी ठरले आहेत.  असे कंपनीचे म्हणणे आहे. परंतु अंबानींनी आपल्यावरील सर्व आरोप फेटाळले. आपले मोठे बंधू मुकेश अंबानी यांच्या रिलायन्स जिओ कंपनीसोबतचा रिलायन्स टेलीकॉम कंपनीच्या विक्रीचा व्यवहार असफल झाला आहे. त्यामुळे ती दिवाळखोरीत काढण्याची प्रक्रिया सुरु आहे. त्यामुळे कंपनीच्या मालमत्तेवर आपले कोणतेही नियंत्रण नाही. एरिक्सन कंपनीला पैसे देण्यासाठी आपण आकाशपाताळ एक केले आहे. परंतु त्यात यश आलेले नाही. असे अनिल अंबानींनी सर्वोच्च न्यायालयात सांगितले. मात्र न्यायालयाने ते म्हणणे ग्राह्य धरले नाही.

याप्रकरणात अनिल अंबानींसह दोन संचालकांना दोषी ठरवत न्यायालयाने खडे बोल सुनावले. एरिक्सन कंपनीच्या थकबाकीपैकी ४५० कोटी रुपये ४ आठवड्यात द्या अन्यथा तीन महिने तुरुंगवासासाठी तयार राहा असे न्यायालयाने स्पष्ट केले. अनिल अंबानी यांनी मुद्दाम न्यायालयाच्या आदेशाची अवहेलना केली आहे. त्यांनी न्यायालयात दिलेल्या शपथपत्राचा भंग केला आहे. असे न्यायालयाने म्हटले आहे.