‘अंजली से खट्टी- मिठी बाते करो’; रेल्वे कोचमध्ये लिहला दमानियांचा मोबाइल नंबर

मुंबईः पोलीसनामा आॅनलाईन

‘अंजली से खट्टी- मिठी बाते करो’, असा मजकूर असलेले पत्रक रेल्वेच्या डब्यात लावण्यात आले असून चक्क या पत्रकांवर दमानिया यांचा मोबाइल क्रमांकही लिहीण्यात आला आहे. सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांचा मोबाईल क्रमांक रेल्वेच्या डब्यात लावण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी दमानिया यांनी पोलिसांत तक्रार दाखल केली असून या गहाणेरड्या प्रकराचा सर्वच स्तरातून निषेध व्यक्त होत आहे.

अंजली दमानिया यांनी आपल्या ट्विटरवर ट्विटकरुन या घटनेची माहिती दिली. या ट्विटमध्ये अंजली दमानिया म्हणतात, की गेल्या तीन दिवसांपासून मला जळगाव, भुसावळ, गोरखपूर या भागांमधून अज्ञात व्यक्तींकडून फोनवरुन त्रास दिला जात आहे. राजकारणी किती खालच्या पातळीवर जातात, हे यावरुन स्पष्ट होते. अंजली दमानिया यांनी एक फोटो देखील ट्विट केला आहे. तसेच या फोटोत रेल्वेच्या डब्यात लावलेले पत्रक दिसत आहे. या पत्रकावर दमानिया यांच्या मोबाइल क्रमांक देण्यात आला असून ‘अंजली से खट्टी- मिठी बाते करो’, असे लिहीले आहे.

अंजली दमानिया यांनी या प्रकरणी रेल्वे पोलीस तसेच मुंबई पोलिसांकडे तक्रार दाखल केली असून पोलीस या घटनेचा अधिक तपास करत आहेत.