बिगबॉसने प्रेक्षकांना बनविले उल्लू, जलोटा-जस्लीनचे प्रेमप्रकरण खोटे

मुंबई : पोलीसनामा आॅनलाइन – नातीच्या वयाच्या शिष्येसोबतच्या प्रेमप्रकरणामुळे अचानक प्रसिद्धीच्या झोतात आलेले गायक अनुप जलोटा यांनी बिग बॉस या रिअ‍ॅलिटी शोचा पर्दाफाश केला आहे. बिग बॉस च्या १२ व्या सिझनमधून जलोटा घराबाहेर गेले आहेत. बिग बॉसच्या घराबाहेर पडल्यानंतर जलोटा यांनी म्हटले की, बिग बॉस स्क्रिप्टेड असते. एवढेच नाही तर जस्लीनसोबत माझे नाते बिग बॉसने प्लान केले होते, असे स्पष्टीकरण जलोटा यांनी दिले आहे. जस्लीन मथारू आणि अनुप जलोटा यांच्या जोडीमुळे व त्यांच्या अफेअरमुळे बिग बॉसला चांगलीच प्रसिद्धी मिळाली होती. मात्र, जलोटा यांच्या वक्तव्यामुळे सर्व हवा निघून गेली असून बिग बॉसने प्रेक्षकांना उल्लू बनविल्याचे स्पष्ट झाले आहे.

बिग बॉसच्या १२ व्या सिझनमध्ये भजन गायक अनुप जलोटा आणि त्यांची २८ वर्षांची गर्लफ्रेंड जस्लीन या दोघांची चांगलीच चर्चा झाली. अनेक नेटकऱ्यांनी या दोघांना सोशल मीडियावर ट्रोलही केले होते. अखेर अनुप जलोटा बिग बॉसच्या घराबाहेर पडल्यानंत हे सर्व खोटे असल्याचे त्यांनी म्हटले आहे. बिग बॉसच्या घराबाहेर पडल्यानंतर अनुप जलोटा म्हणाले, जस्लीनला या शोची पहिल्यांदा ऑफर देण्यात आली. त्यानंतर जस्लीनने मला फोन केला आणि तुम्ही माझ्यासोबत येणार का? कारण हे जोड्यांचे बिग बॉस आहे त्यामुळे तुम्ही येऊ शकता का अशी विचारणा केली. मी तिला नाही म्हटले. त्यानंतर तिच्या वडिलांचाही मला फोन आला. केसरी मथारू हे माझे चांगले मित्र आहेत त्यांनीही मला मी बिग बॉसमध्ये जाणार का? असे विचारले होते. मात्र मी त्यांनाही नाही सांगितले. पण केसरी मथारू यांनी माझ्याकडे या शोमध्ये सहभागी होण्यासंदर्भात वारंवार विनंती केली. त्यांच्या आग्रहाखातरच मी या शोमध्ये सहभागी झालो.

आम्ही गुरु आणि शिष्य बनूनच या शोमध्ये जाऊ असे मी आणि जस्लीनने ठरवले होते. तुम्ही जर गुरु आणि शिष्य म्हणून या शोमध्ये आलात तर हा शो चालणार नाही. त्यामुळे आम्ही सांगतो तेच मान्य करा असे आम्हाला बिग बॉस तर्फे सांगण्यात आले. त्यांनी आम्हाला हेच सांगितले की तुम्ही दोघे रिलेशनशीपमध्ये आहात हे तुम्ही जगाला सांगायचे आहे. त्यामुळे शोला टिआरपी मिळेल. तुम्ही गुरु शिष्य म्हणून या शोमध्ये सहभागी झालात तर तो कोणीही पाहणार नाही. जस्लीनला त्यांनी माझ्याआधीच हे सांगितले होते. त्यानंतर त्यांनी मलाही हेच सांगितले. त्यामुळे जस्लीनने प्रीमियरच्या वेळी आम्ही रिलेशनमध्ये असल्याचे सांगितले. बिग बॉसतर्फे जे सांगण्यात आले ती बाब धक्कादायक होती. सिक्रेट रुममध्ये असलेली नाराजी, आमचे भांडण हे सगळे बिग बॉसने सांगितल्या प्रमाणे स्क्रिप्टेड होते असा आरोप जलोटा यांनी केला आहे.