नवी दिल्ली : वृत्तसंस्ठा
स्पर्धेकरता खेळाडूंची निवड असो किंवा मग पुरस्कार निवड असो त्यावरून वाद हा आपल्याकडे ठरलेलाच आहे. क्रीडा जगतातील देशात प्रतिष्ठेचा समजला जाणारा राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार आपल्याला जाहीर न झाल्याने कुस्तीपटू बजरंग पुनियाने नाराजी व्यक्त केली आहे. तसेच सरकारच्या या निर्णयाविरोधात त्याने कोर्टात जाण्याचा इशाराही दिला आहे.
कुस्ती महासंघाच्या वतीने खेलरत्न पुरस्कारासाठी यावेळी बजरंगच्या नावाची शिफारस करण्यात आली होती. पण सरकारने विराट कोहली आणि वेटलिफ्टर मिराबाई चानू यांची निवड केली. त्यामुळ चिडून बजरंगने न्यायालयाचे दरवाजे ठोठावण्याचा इशारा दिला आहे. त्यामुळे याप्रकरणी बजरंग क्रीडा मंत्री राज्यवर्धन सिंग राठोड यांची भेट घेणार आहे. दिल्लीत पत्रकार परिषदेत बजरंगने ही माहिती दिली.
बजरंग म्हणाला, “पुरस्कारांची घोषणा झाल्यानंतर मी नाराज आणि आश्चर्यचकित झालो. यासंदर्भात मी शुक्रवारी क्रीडा मंत्री राजवर्धन राठोड यांची भेट घेणार आहे. माझे नाव या यादीत का आले नाही. मी याचा हक्कदार आहे की नाही, याचे कारण मला जाणून घ्यायचे आहे. जर मी हक्कदार असेन तर मला हा पुरस्कार देण्यात यावा.
गेली काही वर्षे मी सातत्यपूर्ण कामगिरी करतो आहे. एखाद्या पुरस्कारासाठी हात पसरणे योग्य नाही. पण शेवटी हा कारकीर्दीतला सर्वोत्तम पुरस्कार आहे. शिवाय, एखाद्या कुस्तीगीराची कारकीर्द अनिश्चित असते. एखाद्या दुखापतीमुळे कारकीर्द अकाली संपुष्टात येऊ शकते. यावर्षी मला हा पुरस्कार मिळणार नाही, याची मी कल्पनाही केली नव्हती. गेल्या चार वर्षातील माझी कामगिरी पाहा. पूर्वी गुण दिले जात नव्हते पण आता ती पद्धत आहे आणि मला तेवढे गुणही आहेत.”
बजरंगने याच वर्षी गोल्ड कोस्ट कॉमनवेल्थ गेम्स आणि जकार्ता एशियन गेम्समध्ये सुवर्णपदक जिंकले होते. या कामगिरीसाठी त्याची भारतीय कुस्तीसंघाकडून खेलरत्न पुरस्कारासाठी शिफारिश करण्यात आली होती.