रेल्वेचा 31 मार्चपर्यंत मेगा ब्लॉक; ‘या’ दिवशी हुतात्मा, विशाखापट्टणमसह 4 एक्सप्रेस रद्द, काही गाड्यांच्या मार्गात बदल

सोलापूर : पोलीसनामा ऑनलाईन –   मध्य रेल्वेच्या सोलापूर विभागातील भाळवणी ते भिगवण दरम्यान दुहेरीकरणाचे काम हाती घेतल्याने 31 मार्चपर्यंत रेल्वेने ब्लॉक घेतला आहे. त्यामुळे सोलापूर विभागातून धावणारी हुतात्मा, विशाखापट्टणमसह इतर चार गाड्या विविध तारखांना रद्द केल्या आहेत. इतर चार गाड्यांच्या मार्गात बदल केल्याचे रेल्वे प्रशासनाने सांगितले आहे. प्रवाशांनी रद्द झालेल्या व मार्गात बदल झालेल्या गाड्यांची माहिती घेऊनच प्रवास करावा असे आवाहन रेल्वेचे वरिष्ठ वाणिज्य मंडल प्रबंधक प्रदीप हिरडे यांनी केले आहे.

भाळवणी-भिगवण सिंगल लाइन सेक्शनमध्ये दुहेरीकरणाचे काम सुरु आहे. या कामाच्या देखभाल व दुरुस्तीसाठी प्रशासनाने इंजिनियरिंग ब्लॉक घेतला आहे. त्यामुळे सोलापूर ते पुणे व पुणे ते सोलापूर ही गाडी 12, 15, 19, 22, 26, 29, 31 मार्च रोजी धावणार नाही. पनवेल-नांदेड विशेष एक्सप्रेस ही गाडी 15 मार्च व 1 एप्रिल, नांदेड-पनवेल ही गाडी 14, 31 मार्च रोजी धावणार नाही. तसेच विशाखापट्टनम-लोकमान्य टिळक टर्मिनल विशेष एक्सप्रेस ही 12 आणि 30 मार्च रोजी धावणार नाही. लोकमान्य टिळक टर्मिनल- विशाखापट्टनम विशेष एक्सप्रेस ही गाडी 14 मार्च व 1 एप्रिल रोजी धावणार नाही.

मार्गात बदल केलेल्या गाड्या

मुंबई-नागरकॉईल विशेष एक्सप्रेस 13, 16, 17, 18, 20, 23, 25, 27, 30 आणि 31, मार्च रोजी ठाणे, पनवेल, रत्नागिरी, मडगाव, मंगलुरू जंक्शन, शोरणूर, ईरोड, करूर मार्गाने धावेल. तर नागरकॉईल- मुंबई विशेष एक्सप्रेस ही गाडी 12, 15, 16, 17, 19, 22, 23, 24, 26, 29, 30 व 31 मार्च रोजी करूर, ईरोड, शोरणूर, मंगलुरू जंक्शन, मडगाव, रत्नागिरी, पनवेल, ठाणे, मार्गाने धावेल. मुंबई-नागरकॉईल विशेष एक्सप्रेस ही गाडी 12, 15, 19, 22, 26, 29 मार्च रोजी ठाणे, पनवेल, रत्नागिरी, मडगाव, मंगलुरू जंक्शन, शोरणूर, ईरोड, तिरूच्चिराप्पाल्लि मार्गाने जाईल. नागरकॉईल- मुंबई विशेष एक्सप्रेस ही गाडी 14, 18, 21, 25, 28 मार्च रोजी तिरूच्चिराप्पाल्लि, ईरोड, शोरणूर, मंगलुरू जंक्शन, मडगाव, रत्नागिरी, पनवेल, ठाणे, मार्गाने धावेल,असे रेल्वे प्रशासनाने कळवले आहे.