असहिष्णुता कमेंटप्रकरणी आमीर खानला छत्तीसगड हायकोर्टाचा मोठा दिलासा !

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – बॉलिवूड स्टार आमीर खान (Aamir Khan) यानं 2015 साली असहिष्णुताबद्दल केलेल्या कमेंटवर अनेकांनी नाराजी व्यक्त केली होती. 5 वर्षांपूर्वी तो म्हणाला होता की, देशाचा नागरिक या नात्यानं देशात घडणाऱ्या घटनांमुळं चिंता वाटते. इतकंच नाही तर त्याची पत्नी किरण राव (Kiran Rao) हिनंही देश सोडण्याचं वक्तव्य केलं होतं. या विधानानंतर सुपरस्टारविरुद्ध फौजदारी याचिका दाखल करण्यात आली होती. आता या प्रकरणी आमीर खानला मोठा दिलासा मिळाला आहे. छत्तीसगड हायकोर्टानं (High Court Of Chhattisgarh) सुनावणीदरम्यान आमीर खानच्या विरोधात दाखल याचिकेवरील निर्णय दिला आहे.

आमीर खानच्या विरोधात दाखल याचिकेवर कोर्टात 23 नोव्हेंबर 2020 रोजी सुनावणी झाली. यावेळी कोर्टानं ही याचिका फेटाळून लावली आहे. ही तक्रार योग्यतेशिवाय (बिना मेरिट) असल्याचं सांगण्यात आलं.

या सुनावणीवर निर्णय देताना जस्टीस संजय के. अग्रवाल (Sanjay K. Agarwal) यांनी सांगितलं की, मला या याचिकेत काही तथ्य वाटत नाही. अर्थहीन आणि बिना मेरिट असल्यानं ही याचिका फेटाळली जात आहे. आमीर खान विरोधात ही याचिका दीपक दिवान नावाच्या एका वकिलानं दाखल केली होती.

आमीरच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचं झालं, तर आमीर खान लवकरच लाल सिंह चड्ढा सिनेमात दिसणार आहे. 1994 मधील हॉलिवूड ब्लॉकबस्टर सिनेमा ‘फॉरेस्ट गंप’चा रिमेक म्हणजे लाल सिंह चड्ढा हा सिनेमा आहे. फॉरेस्ट गंप या सिनेमात टॉम हँक्स यांची प्रमुख भूमिका होती. सिक्रेट सुपरस्टार फेम अद्वैत चन्दन या सिनेमाचे दिग्दर्शन करत आहेत. या सिनेमात अभिनेत्री करीना कपूर आमीरसोबत काम करताना दिसणार आहे.