पुस्तकांचे गाव झाले एक वर्षांचे

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन
पुस्तकांचे गाव या अभिनव प्रकल्पास एक वर्ष पूर्ण होत आहे. या निमित्त भिलार (ता. महाबळेश्वर, जि. सातारा) येथे शुक्रवार दि. ४ मे रोजी वर्षपूर्ती सोहळा विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून साजरा होत आहे, अशी माहिती मराठी भाषामंत्री विनोद तावडे यांनी दिली. खुल्या प्रेक्षागृहाचे (अॅम्फी थिएटर) उद्घाटन, शब्द चांदणे हा सांस्कृतिक कार्यक्रम, नव्या ५ दालनांचे (पुस्तक घरांचे) उद्घाटन, वर्षपूर्ती स्मरणिकेचे प्रकाशन आणि अनेक मान्यवर साहित्यिक, कलाकार यांची प्रकल्पास भेट असे विविध कार्यक्रम होणार आहेत.

पुस्तकांच्या गावात ग्रामपंचायतीने महाराष्ट्र शासनास दिलेल्या जमिनीवर, सुमारे २००-२५० रसिक आरामात बसून कार्यक्रमांचा आनंद घेऊ शकतील, असे खुले प्रेक्षागृह (अॅम्फी थिएटर) बांधून पूर्ण झाले आहे. महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या सहकार्याने, निसर्गरम्य ठिकाणी बांधण्यात आलेल्या या प्रेक्षागृहाचे उद्घाटन उद्योगमंत्री सुभाष देसाई यांच्या हस्ते, दु. १२ वा. होणार आहे. गावातील श्रीराम मंदिराजवळ उभारण्यात आलेल्या या खुल्या प्रेक्षागृहात सायं. ५ वाजता शब्द चांदणे हा सांस्कृतिक कार्यक्रम होणार असून विघ्नेश जोशी, निधी पटवर्धन, नचिकेत लेले, संदीप खरे, नंदेश उमप व कमलेश भडकमकर आदी कलाकार हा साहित्य व वाचनसंस्कृती या विषयीचा सांगीतिक – साहित्यिक कार्यक्रम सादर करणार आहेत.

वर्षपूर्ती सोहळ्याचे औचित्य साधून स्पर्धा परीक्षा, नाटक व चित्रपट, चित्रमय पुस्तकं, कादंबरी (दालन २) व चरित्रे – आत्मचरित्रे (दालन २) या नव्या ५ दालनांचा (पुस्तक घरांचा) शुभारंभ करण्यात येणार आहे. याप्रसंगी डॉ. सदानंद मोरे, भारत सासणे, डॉ. माधवी वैद्य, मोनिका गजेंद्रगडकर, योगेश सोमण, ल. म. कडू, प्रदीप निफाडकर, अतुल कहाते, विश्वास कुरुंदकर, किशोर पाठक, विनायक रानडे आदी साहित्य क्षेत्रातील मान्यवर पुस्तकांच्या गावास भेट देणार आहेत.