100 कोटी वसुली प्रकरण : ED करणार बारमालकांची चौकशी, 5 जणांना समन्स

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन –  राज्याचे तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सचिन वाझेंना दरमहा 100 कोटी हप्ता वसुलीचे टार्गेट दिले होते, असा सनसनाटी आरोप करून मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमवीर सिंग राज्यात खळबळ उडवून दिली होती. दरम्यान आता या वसुली प्रकरणात ईडी बारमालकांची चौकशी केली जाणार आहे. ईडीने मुंबईतील 5 बारमालकांना समन्स बजावून त्यांना चौकशीसाठी हजर राहण्यास सांगितले आहे.

माजी गृहमंत्री देशमुख यांनी सचिन वाझे आणि आणखी दोन पोलीस अधिकाऱ्यांना बारमालक आणि इतरांकडून 100 कोटीची वसुली करण्यास सांगितले होते असा आरोप सिंग यांनी केला होता. तर दुसरीकडे कारवाई होऊ नये म्हणून बारमालक दर महिन्याला अडीच लाख रुपये देत होते, असा आरोप पोलीस दलातून हकालपट्टी केलेला एपीआय सचिन वाझेने केला होता. सेवेत असताना वाझे परमबीर सिंह यांना रिपोर्ट करत होता. मार्चमध्ये वाझेला अटक केली होती. यानंतर ईडीने यात उडी घेत दोन आठवड्यांपूर्वी देशमुख यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला. गेल्या आठवड्यात ईडीने अ‍ॅड. जयश्री पाटील यांचा जबाब नोंदवला होता. जयश्री पाटील यांनीही अनिल देशमुख यांच्याविरोधात याचिका दाखल केली आहे. यावरून उच्च न्यायालयाने यात सीबीआय चौकशी करण्याचे निर्देश दिले होते. तर याच प्रकरणाच्या अधिक चौकशीसाठी ईडीने 5 बारमालकांना समन्स बजावून याबाबतच्या चौकशीसाठी बोलावले आहे.