अरबी समुद्रातील शिवस्मारकापर्यंत पोहोचण्यासाठी भुयारी रेल्वेच्या पर्यायाची तपासणी – अशोक चव्हाण

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – ऐतिहासीक वारसा जपण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज यांचे भव्य शिवस्मारक मुंबईतील अरबी समुद्रात उभारण्यात येणार आहे. मात्र स्मारक समुद्रात असल्याने तिथंपर्यंत लोक पोहचणार कसे याचा विचार राज्य सरकार करत आहे. शिवस्मारकापर्यंत पोहचण्यासाठी काही पर्याय आहेत का हे तपासावे लागणार आहे. त्याठिकाणी 12 महिने बोटीने जाणे शक्य होणार नाही. पावसाळ्यात समुद्र खवळलेला असल्याने तिथे बोटीने जाता येणार नाही. वर्षभर वाहतूक करायची असेल तर भुयारी रेल्वेच्या पर्यायाची तपासणी केली जात असल्याची माहिती राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी दिली.

अरबी समुद्रातील शिवस्मारकाची जागा राजभवनापासून 1.2 किमी, गिरगाव चौपाटीपासून 3.6 किमी आणि नरिमन पॉइंटपासून 2.6 किमी अंतरावर आहे. तसेच सुमारे 6.8 हेक्टर बेटावर छत्रपती शिवाजी महाराज यांचा 210 मीटर उंचीचा पुतळा उभारला जाणार असून हा जगातील सर्वाधिक उंचीचा पुतळा ठरणार आहे. 2500 कोटींचा हा प्रकल्प असून त्यात जीएसटी धरला नाही. हा प्रकल्प पुर्ण करण्यासाठी 36 महिन्यांचा कालावधी लागण्याचा अंदाज आहे. शिवाजी महाराजांचा अश्वारुढ पुतळा प्रसिद्ध शिल्पकार राम सुतार बनवणार आहेत. या स्मारकात मंदिर, संग्रहालय, रुग्णालय, रायगड किल्ल्याच्या प्रवेशद्वाराची प्रतिकृती आणि शिवाजी महाराजांचे जीवनपट उलगडण्यासाठी थिएटर असेल. आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे यात पर्यटकांना शिवस्मारक पाहता यावे यासाठी 180 मीटर उंचीवर जाणारी लिफ्ट असणार आहे.